SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राष्ट्रवादीतील ‘पेल्यातील वादळ’ पेल्यातच शमले; 'गोकुळ' आणि साखर कारखानदारीच्या प्रश्नांवर मंत्री हसन मुश्रीफ यांचे मोठे वक्तव्य!टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी महत्त्वाची बातमी: वाहन नोंदणीसाठी २५ जूनपर्यंत मुदतवाढ!वसई-विरारमध्ये शिवसेना (UBT) गटाला मोठा धक्का; जिल्हाप्रमुखांशिवाय अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपा युवा मोर्चात जाहीर प्रवेश!आधुनिक भारताचे शिल्पकार: पंडित जवाहरलाल नेहरूगणेशोत्सवात कोल्हापूरकरांना मिळणार वातानुकूलित ई-बसेसची भेट; परिवहन सभापती सत्यजित जाधव यांची माहितीजिल्ह्यात खत विक्रीसाठी ऑनलाईन बुकिंग प्रणाली लागू‘डिजिटल शेतीशाळा’ उपक्रम सुरु; शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहनसंजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या साईशा गावंडे विद्यार्थिनीला ७० लाखांचे स्टार्टअप फंडिंग मंजूरगगनबावडा येथे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्नएचएसआरपी बसविण्यास 30 जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ

जाहिरात

 

राष्ट्रवादीतील ‘पेल्यातील वादळ’ पेल्यातच शमले; 'गोकुळ' आणि साखर कारखानदारीच्या प्रश्नांवर मंत्री हसन मुश्रीफ यांचे मोठे वक्तव्य!

schedule27 May 26 person by visibility 197 categoryराजकीय

कोल्हापूर : "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत सर्व नेते, खासदार आणि आमदारांनी उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्रावहिनी पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षांतर्गत वादाची चर्चा म्हणजे केवळ 'पेल्यातील वादळ' होते आणि ते पेल्यातच संपले आहे," असे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे केले. आज बुधवार, दि. २७ मे रोजी सकाळी १०.३० वाजता कोल्हापूर विमानतळावर इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांशी ते बोलत होते. प्रफुल पटेल काही कामानिमित्त या बैठकीला अनुपस्थित होते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शपथविधीनंतर प्रसारमाध्यमांतून झालेल्या टीकेमुळे खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर बोलताना मुश्रीफ म्हणाले, "त्यांना 'व्हिलन' ठरवण्यात आल्याने आणि टार्गेट केले गेल्याने त्यांनी आपली खंत बोलून दाखवली होती. परंतु, संपूर्ण पक्ष पूर्णपणे एकसंघ आहे. तसेच अर्थ खाते आमच्याकडे होते आणि ते नंतर देण्याचे ठरले आहे, त्याबाबतचा निर्णयही लवकरच होईल." आगामी २०२९ च्या निवडणुकीबाबत छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत, निवडणुका आल्या की सर्वच पक्ष तयारी करतात, मात्र आम्ही आगामी निवडणुका 'महायुती' म्हणूनच एकत्रित लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

▪️ 'गोकुळ'ची निवडणूक महायुती म्हणूनच लढणार आणि जिंकणार!
आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघ निवडणुकीसाठी स्थापन केलेल्या 'राजर्षी शाहू समविचारी शेतकरी आघाडी'वर मुश्रीफांनी थेट निशाणा साधला. "त्यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे आणि महायुतीने काय करावे हा आमचा. 'गोकुळ'ची निवडणूक महायुती म्हणून लढायची, जिंकायची आणि चेअरमनही महायुतीचाच करायचा, हे आमचे ठरले आहे," असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जागावाटपाबाबत बोलताना ते म्हणाले की, सध्या जागावाटपावर बोलणे अतिघाईचे ठरेल. आता फक्त संस्थांचे ठराव गोळा करणे, कच्ची व पक्की मतदार यादी तयार करणे हा पहिला टप्पा सुरू आहे. मतदार यादी पूर्ण झाल्यानंतरच जागावाटपाचा कार्यक्रम ठरेल आणि साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये ही निवडणूक लागण्याचा अंदाज आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळेच ही निवडणूक वेळेवर होत असून, कोणाला चपराक बसली असे म्हणता येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

▪️ सीपीआरमधील केबिन वादावर लवकरच तोडगा; अधिकाऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआर रुग्णालयातील अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यातील केबिन वादावर मंत्री मुश्रीफ यांनी सामोपचाराची भूमिका घेतली. "वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर ही सर्व मालमत्ता वैद्यकीय शिक्षण विभागाकडे वर्ग झाली आहे. या वादावर मी आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर एकत्र बसून योग्य तोडगा काढू. सीपीआरच्या नूतनीकरण कामाचे लोकार्पण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या हस्ते होणार आहे, तोपर्यंत सर्व अधिकाऱ्यांनी घाईगडबड न करता शांत राहावे," असे आवाहन त्यांनी केले.

▪️साखर कारखानदार सामूहिक आत्महत्येच्या उंबरठ्यावर; महायुतीचे शिष्टमंडळ दिल्लीला रवाना
"राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारी सध्या प्रचंड मोठ्या संकटात सापडली आहे. एका साखर कारखानदाराने तर सर्व कारखानदारांवर सामूहिक आत्महत्येची वेळ आल्याची भीती व्यक्त केली आहे," अशी चिंता मुश्रीफ यांनी बोलून दाखवली.
याच गंभीर पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांचे शिष्टमंडळ आज दिल्लीला गेले आहे. साखरेचे व इथेनॉलचे दर वाढवणे, इथेनॉलची उचल करणे, को-जनरेशनचे दर वाढवणे, कर्जाचे पुनर्गठन (रिस्ट्रक्चर) करणे, सॉफ्ट लोन देणे आणि व्याजाचा भार केंद्र सरकारने उचलणे या मागण्यांवर दिल्लीतील बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन केंद्र सरकार नक्कीच मार्ग काढेल, असा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेवटी व्यक्त केला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes