सीमावादात समाजाची आणि मानवतेची प्रचंड हानी होते : अधिक कदम
schedule02 Nov 25 person by visibility 129 categoryसामाजिक
कोल्हापूर : राज्याराज्यात सीमावाद सुरु आहे,त्यातून राजकारणाचा हेतू ठेवून काही प्रश्न धगधगत ठेवले जातात मात्र सीमावादात समाजाची आणि मानवतेची प्रचंड हानी होते असे परखड मत बॉर्डरलेस वर्ल्ड फौंडेशन काश्मीरचे अध्यक्ष आणि काश्मीरच्या लोकांचा विश्वास संपादन करत स्वतःचा जीव धोक्यात घालून तिथल्या अडीचशे अनाथ मुलींसाठी वसतीगृहे बांधून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून अनाथांचा नाथ बनलेल्या अधिक कदम यांनी कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे होते.यावेळी मुस्लीम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर उपस्थित होते.
ते म्हणाले २०१४ मध्ये काश्मीर मध्ये प्रचंड महापूर आला आणि तिथले संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले.तिथल्या नागरिकांचे व्यवसाय पाण्यात वाहून गेले.आरोग्य बिघडले त्यानंतर आम्ही कोल्हापूरला आलो होतो आणि चर्चेतून काश्मीरमध्ये अम्ब्युलंस सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आणि इथेच पत्रकार परिषद घेवून जाहीर करून आवाहन केले.कोल्हापुरात जे सुरु केले ते देशाच्या कानाकोपऱ्यात जाते याचा प्रत्यय आम्हाला इथेच आला कारण आम्हाला आम्ही केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून एनएसडीएल संस्थेकडून चार अम्ब्युलंस मिळाल्या.आणि त्याचे लोकार्पण नागपुरात हिंदू मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले.आज त्याच अम्ब्युलंस ची संख्या ४ वरून ४५ वर पोहचली आहे,असे सांगून पहलगाम मधील हल्ल्यात घटनास्थळी मदतीसाठी सर्वात पहिली अम्ब्युलन्स आमच्याच बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनची पोहचली होती, आणि आज काश्मीरमधील जिल्ह्यात प्रत्येक खेड्यात या ४५ अम्ब्युलंस आरोग्यसेवा देत आहेत.
अधिक कदम यांनी सांगितले कि, १९९७ मध्ये त्यांनी पहिल्यांदा काश्मीरला भेट दिली आणि तेथील राजकीय परिस्थिती आणि स्थानिक समस्यांचा अभ्यास केला. त्यांचे सुरुवातीचे प्रयत्न स्वयंसेवा, मुंबई, पुणे, दिल्ली, जम्मू आणि श्रीनगर येथील विविध स्वयंसेवी संस्थांसाठी काम करणे आणि युनिसेफ समर्थित प्रकल्पांवर केंद्रित होते.असंख्य भेटी आणि तेथील जमिनीवरील वास्तवाचे सखोल आकलन झाल्यानंतर, त्यांनी काश्मिरी मुले आणि महिला, विशेषतः अनाथ आणि विधवांच्या उन्नतीचे काम हाती घेतले. १२ मे २००२ रोजी, बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनने त्यांचा पहिला प्रकल्प सुरू केला; बसेरा-ए-तबस्सुम (स्मितांचे निवासस्थान), काश्मीर खोऱ्यातील कुपवाडा (सुलकूट गाव) या सीमावर्ती जिल्ह्यात अनाथ मुलींसाठी हे पहिले घर सुरु केले. यावेळी अधिक कदम यांना तेथील धार्मिक प्रमुख आणि मौलवींकडून तीव्र प्रतिकार झाला.मात्र त्यांच्या जीवाला धोका असूनही त्यांनी हा प्रकल्प सोडून सुरक्षित ठिकाणी काम करण्यास नकार दिला.आज बॉर्डरलेस वर्ल्ड फौंडेशन हि एनजीओ जम्मू आणि काश्मीरच्या चार जिल्ह्यांमध्ये मुलींसाठी चार अनाथाश्रम चालवत आहे.२००२ मध्ये फक्त २ मुली होत्या, आज ४ केंद्रांमध्ये २५० हून अधिक अनाथ मुली आहेत.यापैकी काही मुली उच्च शिक्षण घेवून स्वावलंबी बनल्या आहेत.
कोल्हापुरात गणी आजरेकर यांच्या घरी राहून आजही काश्मिरी पंडितांची सिमरन नावाची एक मुलगी कायद्याचं शिक्षण घेत आहे.तर दोन मुली यापूर्वी त्यांच्याकडेच वास्तव्य करून एक वकील तर दुसरी सिव्हिल इंजिनीअर बनून सद्या दिल्लीत नोकरी करत आहेत अशी माहिती अधिक कदम यांनी दिली.
ते म्हणाले आतंक वादाकडे जाणाऱ्या मुलांचे परिवर्तन करण्याचे कार्य आम्ही करत आहोत.आतंकवाद मारून नाही वाचवून संपवता येईल, आतंकवादाचा परिणाम कुटुंबावर होतो.त्यामुळे संस्कृतीचा ह्रास होतो,आणि म्हणूनच काश्मिरी महिला आणि मुलीना शिक्षित करणे आमचे ध्येय आहे.आम्ही आतंकवाद्यांच्या मुलीना सुद्धा आमच्याकडे सांभाळून त्यांना डॉक्टर वकील आणि इंजिनीअर बनवले आहे, अजून ३०० हिंदू मुलींसाठी आम्हाला जम्मूमध्ये वसतिगृह बांधावयाचे आहे असेही त्यांनी नमूद केले.
काश्मीर मध्ये ३७० कलम हटवण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला मात्र आजही त्याठिकाणी १५ वर्षे नागरिकत्व असेल तरच जमीन खरेदी करता येईल हा नियम लागू आहे असे त्यांनी स्पष्ट केले.मात्र ३७० कलम हटवल्याने समाजात एकरूपता येवू लागल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमासाठी कोल्हापूर प्रेस क्लबचे पत्रकार सदस्य यावेळी उपस्थित होते, प्रास्ताविक व सूत्रसंचालन समीर मुजावर यांनी केले तर आभार उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर यांनी मानले.