विकेंद्रित ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि क्रिप्टोग्राफी भविष्यात सर्वव्यापी; डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेतील सूर
schedule01 Nov 25 person by visibility 174 categoryशैक्षणिक
कोल्हापूर: डिजिटल विश्वातील पारदर्शकता, सुरक्षितता याविषयीच्या संकल्पना ब्लॉकचेन आणि क्रिप्टोग्राफी तंत्रज्ञानामुळे बदलल्या जाणार असून हे तंत्रज्ञान भविष्यात सर्वव्यापी होणार आहे. ' डिजिटल ट्रस्ट ' आणि ' इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट ' यांचा पाया नवतंत्रज्ञानामुळे भक्कम होणार आहे. डाटा अनालिटिक्स, ऑनलाइन सर्व्हिसेस आणि क्लाऊड प्लॅटफॉर्म्स यांना डिस्ट्रीब्यूटेड सिस्टिम्समुळे नवा आधार मिळाला आहे , असा सूर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये तज्ञांच्या चर्चासत्रामध्ये उमटला.
इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स (पुणे सेक्शन, मुंबई सेक्शन) ,कॉम्प्युटर सोसायटी ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ' इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ब्लॉकचेन डिस्ट्रीब्यूटेड सिस्टिम्स ॲन्ड सिक्युरिटी ' या तीनदिवसीय परिषदेच्या समारोपाच्या दिवशी आयोजित चर्चासत्रामध्ये श्रोत्यांची प्रचंड उपस्थिती होती.
' सेक्युरिंग हेल्थकेअर इन्फ्रास्ट्रक्चर', ' लँड रेकॉर्ड मॅनेजमेंट' आणि ' फायनान्स ट्रांजेक्शन सेक्युरिटी ' या संवेदनशील विषयांवर ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा प्रभाव या अनुषंगाने सांगोपांग चर्चा करण्यात आली. आयईईई कॉम्प्युटर सोसायटी पुणे चॅप्टरचे चेअरमन डॉ. राजेश इंगळे, कर्टीन विद्यापीठ (ऑस्ट्रेलिया) येथे कार्यरत संशोधक डॉ. विद्यासागर पोतदार, इलिऑट सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेडचे सीटीओ अँड हेड ऑफ इंडिया ऑपरेशन्स डॉ. गिरीश खिलारी आणि डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी चर्चासत्रामध्ये सहभाग घेतला आणि जनसामान्यांना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे मूलभूत ज्ञान ते दैनंदिन जीवनातील उपयोग यावर सुबोध शैलीमध्ये प्रकाश टाकला.
यावेळी श्रोत्यांचे प्रश्न आणि शंकांचे समाधानकारक निरसन तज्ञांनी केले. सुप्रसिद्ध निवेदक चारुदत्त जोशी यांनी सहसंवादकाची तथा निवेदकाची भूमिका कौशल्याने सांभाळली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयी मिळालेल्या माहितीमुळे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली. समाजातील सर्व घटकांनी परिषदेविषयी समाधान व्यक्त केले आणि भविष्यात अशा प्रकारच्या परिषदा आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
रुग्णांच्या निर्दोष आणि सुरक्षित तपशीलासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान महत्वाचे असून विविध हॉस्पिटल्स, प्रयोगशाळा आणि इन्शुरन्स पुरवणाऱ्या कंपन्या यांच्यामध्ये स्पष्ट साखळी या तंत्रज्ञानामुळे उपलब्ध होणार असल्याचा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला. स्थावर संपत्तीची पारदर्शक कागदपत्रे निर्माण होऊन जमिनीचे खरेदी- विक्री व्यवहार ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे सुकर होतील, तसेच जमीन व्यवहारातील घोटाळे आणि तंटे पूर्णपणे नष्ट करण्यात यश येईल, असे सप्रमाण दाखवून देण्यात आले. ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे कमी खर्चामध्ये गतिमान बॉर्डरलेस पियर टू पियर पेमेंट्स शक्य होणार असून बँका आणि क्लिअरिंग हाऊसेससारखे मध्यस्थ कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच क्रिप्टोग्राफिक पडताळणीमुळे आदान प्रदान व्यवहार सक्षम होतील, हा एक क्रांतिकारी बदल आहे यावर सर्वांचे मतैक्य झाले.
परिषदेसाठी देश विदेशातून आलेल्या संशोधकांना महाराष्ट्र आणि विशेषतः कोल्हापूरचे सांस्कृतिक दर्शन घडविणाऱ्या ' महाराष्ट्र दर्शन ' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले. पोवाडा, कोळीनृत्य, शेतकरी नृत्य, शिवराज्याभिषेक सोहळा वगैरे अस्सल मराठमोळ्या कलांचे प्रभावी सादरीकरण स्थानिक कलाकारांनी करून उपस्थियांची मने जिंकली. परिषदेच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य देणारे माध्यम प्रतिनिधी, उद्योजक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर , प्रतिष्ठित नागरिक, प्राचार्य यांचा परिषदेचे स्मृतीचिन्ह देऊन यावेळी सन्मान करण्यात आला. ब्लॉकचेन तंत्रज्ञानामध्ये असलेल्या करियर संधी विषयी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
परिषदेच्या यशस्वी संचालनासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, गौरव गावडे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी यांनी तीन दिवसीय परिषदेसाठी सर्व सुविधा व मनुष्यबळ यांचे उत्तम नियोजन करून संचालन केले. इन्स्टिट्यूटमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी निरंतर परिश्रम घेऊन परिषद यशस्वी केली.