शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
schedule09 Jun 26 person by visibility 137 categoryसामाजिक
कोल्हापूर : प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'च्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचा संताप आज रस्त्यावर उतरला. सुपीक जमिनी हिरावून घेणाऱ्या या महामार्गाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी विराट मोर्चा काढण्यात आला काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा धडक मोर्चा काढण्यात आला.
या आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो शेतकऱ्यांनी "विकासकामांच्या नावाखाली आम्हाला भूमिहीन करण्याचा डाव आम्ही सहन करणार नाही," असा इशारा दिला. "आम्हाला महामार्ग नको, आमची काळी आई (जमीन) हवी आहे," अशी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांनी आपला लढा अधिक तीव्र करण्याचे संकेत आहेत.
आंदोलनाचे नेतृत्व करताना आ. सतेज पाटील यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, "शक्तीपीठ महामार्ग म्हणजे केवळ कंत्राटदारांचे कमिशन आणि खिसे भरण्याचा खटाटोप आहे. अकरा नद्या ओलांडून येणारा हा रस्ता अनेक गावे आणि मंदिरांचे नुकसान करणारा आहे. भाजपचे हिंदुत्व आता कुठे गेले आहे? दीड-दोनशे मंदिरांना फटका बसणार असताना सरकार गप्प का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, सरकारचा हा मनमानी कारभार कोल्हापूरची जनता कदापि सहन करणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
गेल्या सव्वा दोन वर्षांपासून हा लढा सुरू असून, सरकारने बळजबरीने जमिनी संपादित करण्याचा प्रयत्न केल्यास यापेक्षाही भीषण आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राजू शेट्टी आणि सतेज पाटील यांनी दिला आहे. महामार्गामुळे पाच-दहा किलोमीटर परिघात येणाऱ्या गावांसाठी पुराचे संकट निर्माण होईल, अशी भीतीही यावेळी व्यक्त करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिलेल्या या मोर्चाने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले असून, आता सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.