'छात्रों की गूंज': पेपर फुटीवरून काँग्रेस आक्रमक; केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
schedule19 Jul 26 person by visibility 307 categoryराज्य
कोल्हापूर: देशातील परीक्षार्थींच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्र सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करत, काँग्रेस पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. 'छात्रों की गूंज' या अभियानाच्या माध्यमातून देशभरातील विद्यार्थ्यांचा आवाज बनत, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या परीक्षा घोटाळ्यांचे पितळ उघडे पाडले आहे. याच संदर्भात, विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून देशातील कोट्यवधी युवक आणि युवती परीक्षेच्या माध्यमातून आपल्या आयुष्याचे स्वप्न पाहत आहेत. मात्र, सातत्याने होत असलेल्या पेपर फुटीच्या घटनांमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जात आहे. २०१४ पासून आतापर्यंत देशात १५२ हून अधिक पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, यावर केंद्र सरकार मूग गिळून गप्प का, असा सवाल सतेज पाटील यांनी उपस्थित केला आहे.
केवळ परीक्षा घेणे म्हणजे व्यवस्थापन नव्हे, तर परीक्षा पारदर्शक पद्धतीने राबवणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. मात्र, यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा घणाघाती आरोप करत, आमदार पाटील यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी आग्रही मागणी केली आहे. 'छात्रों की गूंज' ही मोहीम देशातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या न्याय हक्कासाठी तीव्र केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.