कोल्हापुरात प्रशासनाची धडक मोहीम: राजारामपुरी व लक्ष्मीपुरी परिसरातील रस्ते अडविणारी ४३ चार चाकी बेवारस वाहने हटविली!
schedule10 Sep 26 person by visibility 170 categoryगुन्हे
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात रस्ते आणि रहदारीच्या ठिकाणी दिवसन् दिवस धुळ खात पडून रहदारीस अडथळा ठरणाऱ्या बेवारस वाहनांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने धडक कारवाई सुरू केली आहे. राजारामपुरी हद्दीतील यादवनगर, आईचा पुतळा, पांजरपोळ परिसर तसेच लक्ष्मीपुरी हद्दीतील व्हिनस कॉर्नर ते दसरा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पूल या परिसरात मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या कडेला वाहने पार्किंग केली जात होती. यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असल्याने नागरिकांमधून तक्रारी येत होत्या.
या प्रकारची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक नियंत्रण शाखेने विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेअंतर्गत काल दिनांक ९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १२ आणि आज दिनांक १० सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत धडक कारवाई करण्यात आली. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस अधिकारी, अंमलदार व क्रेन वाहनाच्या सहाय्याने रस्त्याच्या कडेला दीर्घकाळ पडून असलेली तब्बल ४३ चार चाकी वाहने व अनेक दुचाकी वाहनमालकांना बोलावून हटविण्यात आल्या. तसेच काही वाहने लाऊडस्पीकरद्वारे अनाऊन्स करून तातडीने काढून घेण्यात आली.
सदर कारवाई दरम्यान परिसरातील नागरिकांना वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे तसेच वाहने अस्ताव्यस्त किंवा रस्त्यावर धोकादायक रीतीने पार्क न करण्याची सूचना देण्यात आली आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या गाड्या रस्त्यावर धुळ खात पडून राहणाऱ्या किंवा डबल पार्किंग करणाऱ्या स्थितीत ठेवू नयेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अन्यथा कोल्हापूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने अशा बेवारस वाहनांना नोटिसा बजावून, न हटविल्यास ती वाहने टोईंग करून दंडात्मक कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
शहर वाहतूक शाखेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, ही मोहीम आगामी काळात अधिक व्यापक व तीव्र स्वरूपात संपूर्ण शहरात राबविली जाईल. त्यामुळे सर्व वाहनधारकांनी मोटर वाहन कायद्याचे व वाहतूक नियमांचे पालन करून कायदेशीर कारवाई टाळावी आणि सहकार्य करावे.
सदरची महत्त्वपूर्ण कारवाई शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व निरीक्षणाखाली नेमणूक असलेले पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी पार पाडली आहे.