बाल विवाह मुक्त महाराष्ट्रसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन
schedule03 Dec 25 person by visibility 40 categoryराज्य
कोल्हापूर : बाल विवाह मुक्त महाराष्ट्र आपला संकल्प अभियान 15 ऑक्टोंबर ते 26 जानेवारी या कालावधीत जिल्हयामध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये समुदाय स्तरावरून जनजागृती, बाल महोत्सव, क्षमता वृध्दी कार्यशाळा / प्रशिक्षण, स्त्री मुक्त दिन दिवशी रॅली, प्रचार प्रसिध्दी, जिंगल बेल्स इ . कार्यक्रम घेण्यात येत आहेत. यामध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्प लाईन 1098, आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था, इचलकरंजी, अवनी संस्था, कोल्हापूर मार्फत मोठया प्रमाण बाल विवाह मुक्त कोल्हापूर जिल्हा करण्याकरता कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
बाल विवाह होवू नये याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामीणसाठी ग्रामसेवक तर शहरीसाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची आहे. त्याचबरोबर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुका बाल संरक्षण समिती यांनी तालुक्यातील गावांचा आढावा घेऊन तालुका बाल विवाह मुक्त करावा याबाबत 26 जानेवारी 2026 रोजी उत्कृष्ठ गाव व तालुक्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. बाल विवाह केल्यास बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार दोन लाख रूपये दंड किंवा 5 वर्ष सक्त मजुरी किंवा दोन्ही शिक्षा होवू शकतात.
त्याचप्रमाणे प्रिटींग प्रेस , मंगल कार्यालय वाजंत्री, लग्न लावणारे पोरोहित करणारे व लग्न सोहळयामध्ये सहभागी होणारी मंडळी यांच्यावर ही गुन्हे दाखल केले जातील. गावातील सरपंच, पोलीस पाटील व ग्रामसेवक यांनी गावामध्ये बालविवाह होणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी. सरपंच हे ग्राम बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष असून पोलीस पाटील हे गाव व पोलीस स्टेशन यांना जोडणारा मुख्य दुवा आहे. सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी गावात कोणाचा विवाह ठरल्यास त्या मुला मुलीच्या वयाची खात्री करावी. जेणे करून गावात बाल विवाह होणार नाही व कोल्हापूर जिल्हा हा बाल विवाह मुक्त जिल्हा होईल. याबाबत दि. 27 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व भागधारकांची बैठक संपन्न झाली होती.