मंत्री दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, यांनी घेतली पद्मश्री डी. वाय. पाटील कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
schedule06 Aug 26 person by visibility 178 categoryसामाजिक
कोल्हापूर : राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे व सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी पद्मश्री डी. वाय. पाटील कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातही पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे योगदान अतुलनीय होते. त्यांचे शेतीवर विशेष प्रेम असल्यामुळे ते शेवटपर्यंत बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने राज्याचे मोठे नुकसान झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी राज्यातील शेतकरी बांधवांच्यावतीने पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, गेल्या सात दशकांहून अधिक काळ पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान अजरामर आहे. त्यांच्या कार्याचा लाभ तीन-चार पिढ्यांनी घेतला असून त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. शिक्षण, सामाजिक, वैद्यकीय आणि सार्वजनिक क्षेत्रात त्यांनी उभारलेला वारसा प्रेरणादायी आहे, असे सांगून त्या पुढे म्हणाल्या, लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना त्यांचे अनुभव, मार्गदर्शन आणि सूचनांचा अनेकांना लाभ झाला. राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी जपलेली माणुसकी आणि समाजहिताची भूमिका कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबियांनी हा समृद्ध वारसा समर्थपणे पुढे नेला असून तो भविष्यातही अधिक बळकट होईल.
मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, पद्मश्री डी.वाय.पाटील यांच्या निधनाने देशासह राज्यात पोकळी निर्माण झाली आहे. जीवनात एखादा व्यक्ती किती काम करु शकते, त्याचे उदाहरण म्हणून पद्मश्री डी.वाय.पाटील यांचे नाव घेता येईल. त्यांनी ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या. त्याचबरोबर नागरिकांसाठी आरोग्याच्या वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या. त्यांच्या निधनाने खूप मोठी हानी झाली आहे.
यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, सर्वश्री आमदार सतेज पाटील, विश्वजित कदम, मिलिंद नार्वेकर, अभिमन्यू पवार, विवेक कोल्हे, माजी आमदार ऋतुराज पाटील, क्षितिज ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, नगरसेवक आदिल फरास आदि उपस्थित होते.