अभियांत्रिकी प्रवेशाच्या शंकांना मिळणार पूर्णविराम; केआयटीतर्फे ७ जून रोजी मोफत मार्गदर्शन कार्यक्रम
schedule05 Jun 26 person by visibility 167 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : कोल्हापूर येथे बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी केआयटी (KIT) अभियांत्रिकी महाविद्यालयाने एक विशेष पुढाकार घेतला आहे. प्रवेश प्रक्रियेशी संबंधित अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक माहिती देण्यासाठी रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी 'अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरच्या संधी व प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया-२०२६' या विषयावर मोफत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, जो सकाळी १० वाजता आनंद भवन, सायबर कॉलेज, कोल्हापूर येथे संपन्न होईल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ प्रवेश प्रक्रियेची माहिती मिळणार नाही, तर भविष्यातील करिअरच्या दृष्टीने योग्य शाखा निवडण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, मशीन लर्निंग, सायबर सुरक्षा, रोबोटिक्स, इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमधील संधींबाबत सखोल माहिती दिली जाणार आहे.
या कार्यशाळेत प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्याचे सविस्तर मार्गदर्शन केले जाईल, ज्यामध्ये ऑनलाइन नोंदणी, कागदपत्र पडताळणी, प्राधान्यक्रम निवड, जागावाटप प्रक्रिया (कॅप राउंड), प्रवेश निश्चिती आणि विविध शिष्यवृत्ती योजना, शासकीय आर्थिक सवलती, आरक्षण धोरण, ईबीसी व इतर शुल्क सवलतींबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
केआयटीचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी सांगितले की, गेल्या ४३ वर्षांपासून गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षणाची परंपरा जपणारे केआयटी हे 'एम्पॉवर्ड ऑटोनॉमी' दर्जा प्राप्त अग्रगण्य संस्थांपैकी एक आहे आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० च्या अनुषंगाने उद्योगाभिमुख, कौशल्यधारित आणि संशोधनकेंद्रित शिक्षण प्रणाली विकसित करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता व प्रवेश प्रक्रिया प्रमुख डॉ. महेश शिंदे यांनी नमूद केले की, अनेकदा योग्य माहितीअभावी विद्यार्थी आणि पालकांच्या मनात गोंधळ असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य शाखा आणि महाविद्यालयाची निवड करण्यास सक्षम करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा कार्यक्रम पूर्णतः मोफत असून, करिअरविषयक मार्गदर्शन घेऊ इच्छिणाऱ्या विज्ञान शाखेतील विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केआयटीच्या वतीने करण्यात आले आहे.
संस्थेचे सचिव दीपक चौगुले व वरिष्ठ विश्वस्त सुनील कुलकर्णी हे या पत्रकार परिषदेस उपस्थित होते. पत्रकारांशी झालेल्या प्रश्नोत्तराच्या सत्रात त्यांनी सहभाग घेतला. यावेळी प्रा. अमर टिकोळे डॉ निवास पाटील व प्रा.अमित वैद्य उपस्थित होते.