सावधान! अक्षयतृतीयेला बालविवाह केल्यास होईल जेल; कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन
schedule13 Apr 26 person by visibility 143 categoryराज्य
कोल्हापूर : अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात छुप्या मार्गाने होणारे बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, नागरिकांनी या सामाजिक अनिष्ट प्रथेविरुद्ध सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे यांनी केले आहे. कायद्यानुसार विवाहासाठी मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण असणे अनिवार्य आहे; याचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर 'बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६' नुसार कठोर कारवाई करण्यात येईल.
या गुन्ह्यात केवळ पालकांवरच नव्हे, तर विवाह लावणारे भटजी, वाजंत्री, मंगल कार्यालय चालक आणि उपस्थित वऱ्हाडी यांच्यावरही गुन्हे दाखल होऊ शकतात, ज्यामध्ये दोन वर्षांचा कारावास आणि ५ लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे.
ग्रामसेवक, पोलीस पाटील आणि अंगणवाडी सेविकांनी वधू-वरांच्या वयाची खातरजमा करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना कोठेही बालविवाह होत असल्याचे आढळल्यास त्यांनी तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन १०९८ किंवा पोलीस क्रमांक ११२ वर संपर्क साधावा; माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.