पोषण अभियानात कोल्हापूरचा तिसरा क्रमांक
schedule28 Feb 26 person by visibility 87 categoryराज्य
🔲 कोल्हापूर जिल्हयातील १८ ग्रामपंचायतींना केंद्र शासनाचे १ लाखाचे प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर
कोल्हापूर : केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या सुपोषित ग्रामपंचायत अभियान अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्याने उत्तेखनीय कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींची उत्कृष्ट कार्याबद्दल निवड झाली असून राज्यात कोल्हापूर जिल्ह्याने तिसरा क्रमांक पटकावला आहे. या यशस्वी ग्रामपंचायतींना केंद्र शासनामार्फत प्रत्येकी १ लाख रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस आणि विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मस्के यांनी दिली.
निवडीचे निकष आणि प्रक्रियाः- या अभियानांतर्गत ग्रामपंचायतींमधील अंगणवाडी केंद्रांतील बालकांच्या कुपोषण निर्मूलनावर भर देण्यात आला होता ज्या ग्रामपंचायतींमध्ये मध्यम तीव्र कमी वजनाची (MUW) आणि अति तीव्र कमी वजनाची (SUW) बालके राष्ट्रीय सरासरीपेक्षा (MUW - १४.३९% आणि SUW ३.४३%) कमी आहेत, अशा ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. जिल्ह्यातील एकूण १०२५ ग्रामपंचायतींपैकी २९६ ग्रामपंचायती मानांकनासाठी पात्र ठरल्या होत्या, त्यातून अंतिम १८ ग्रामपंचायतींची निवड झाली आहे.
◼️पुरस्कारास पात्र ठरलेल्या १८ ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे -
▪️आजरा- कासारकांडगाव, साळगांव, कोवाडे
▪️भुदरगड- मुदाळ, व्हनगुत्ती
▪️गडहिंग्लज- हडलगे, उंबरवाडी
▪️गगनबावडा कोदे, अणदुर, साखरी म्हांळुगे
▪️कागल- पिंपळगांव खुर्द
▪️करवीर- हलसवडे, पाडळी बुद्रुक
▪️पन्हाळा- पोहाळे तर्फ आळते, कसबा बोरगांव, काळजवडे
▪️राधानगरी- घोटवडे, नरतवडे
सार्वजनिक आरोग्य व कुंटूब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. व जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली याकामी शिरोळच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी मनिषा पालेकर आणि जिल्हा कक्षाचे विस्तार अधिकारी (सां) सौरव कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे जिल्ह्याला हा बहुमान मिळाला आहे.