मुंबई : विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. राज्यातील वातावरण पुढील दोन दिवस तापणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील काही भागांमध्ये पाऊस तर काही भागांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी पावसाचा देखील अंदाज वर्तवण्यात आलाय. मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रात तापमानाचा पारा हा 40 ते 42 डिग्री से. राहणार असल्याच सांगण्यात येत आहे. सरासरी कमाल तापमानापेक्षा 3 ते 4 डिग्रीने तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी ठिकाणी तापमान वाढेल, असाही अंदाज दिलाय. तर अकोला, बुलडाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला.