बांबू उत्पादक शेतकऱ्यांनी ''ब्रँड ॲम्बेसिडर" बनून जिल्ह्यात बांबूचे क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन
schedule28 May 25 person by visibility 221 categoryराज्य

▪️बांबू लागवड तंत्रज्ञान कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर : बांबू उत्पादक शेतकऱ्यांनी बांबू उत्पादनाचे "ब्रँड ॲम्बेसिडर" (उत्पादन प्रतिनिधी) बनून जिल्ह्यात बांबूचे क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विज्ञान केंद्र, कणेरी मठ व बांबू सोसायटी ऑफ इंडिया महाराष्ट्र चाप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने कणेरी मठ येथील कृषी विज्ञान केंद्रात बांबू लागवड तंत्रज्ञान कार्यशाळा घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास श्रीसिद्धगिरी मठाचे काडसिद्धेश्वर स्वामीजी प्रमुख उपस्थित होते. यावेळी कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक अजय कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, आत्माच्या प्रकल्प संचालक रक्षा शिंदे, नीरी नागपूर चे वरिष्ठ शास्त्रज्ञ लाल सिंग, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. रवींद्र सिंह, बांबू सोसायटी ऑफ इंडियाचे खजानीस अरुण वांद्रे, बांबू उत्पादक प्रगतशील शेतकरी प्रदीप तातेड, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, पोपट पाटील, किरण पाटील व अन्य मान्यवर तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, बांबू उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळण्यासाठी शासनाच्या वतीने अनेक उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत. तसेच बांबू लागवडीसाठी अनुदानही देण्यात येत असून याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांनी घ्यावा. पेन्शन मिळवून देणारे पीक म्हणून बांबू लागवडीकडे शेतकरी पाहत आहेत. बांबू लागवड, बाजार भाव, शासनाचे अनुदान या बाबींची माहिती घेऊन अधिकाधिक शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी, जेणेकरून जिल्ह्यातील अधिकाधिक हेक्टर जमिनीवर बांबू लागवड होईल व बांबू उत्पादनात जिल्ह्याचे क्षेत्र वाढेल. मध उत्पादन, रेशीम शेती यातून जिल्ह्यातील शेतकरी प्रगती साधत असून जिल्ह्यात रेशीम शेती प्रमाणेच बांबू उत्पादनासाठी पोषक वातावरण असणाऱ्या भागात बांबूचे उत्पादन वाढण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले, पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने बांबू उत्पादन वाढवणे आवश्यक आहे. शेतीत वेगवेगळे उत्पादन घेताना किंवा नवीन प्रयोग राबवताना सुरुवातीला विरोध होतो, पण याच उत्पादनातून फायदा झाल्यानंतर सर्वजण सोबत येतात, ही मानसिकता समजून घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सामूहिक दृष्ट्या बांबू उत्पादन घेण्यावर भर द्यावा. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ठरवले तर बांबू उत्पादनात क्रांती घडेल, असा विश्वास व्यक्त करुन जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एकत्र येऊन राज्यासह देशाला आदर्शवत ठरतील असे बांबू प्रकल्प जिल्ह्यात तयार करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
▪️विकसित कृषी संकल्प अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ
कृषी व किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या अंतर्गत विकसित कृषी संकल्प अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते व काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत कणेरी मठ येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये पार पडला. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, करवीर, भुदरगड, गडहिंग्लज, आजरा, चंदगड या सहा तालुक्यातील 90 गावांमध्ये या संकल्प यात्रेंतर्गत कृषी रथ भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे.
यामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ तसेच राज्य शासनाच्या कृषी विभाग व आत्मा चे अधिकारी, कर्मचारी सहभागी होणार आहेत.