दत्तवाडचे आरोग्यमंदिर लवकरच जनतेच्या सेवेत : आमदार यड्रावकर
schedule14 Aug 26 person by visibility 100 categoryआरोग्य
◼️ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाची आमदार यड्रावकर यांनी केली पाहणी
दत्तवाड : दत्तवाडसह परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सुविधा गावातच उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने १६ कोटी १५ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात येत असलेले ग्रामीण रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच हे रुग्णालय जनतेच्या सेवेसाठी सज्ज होईल. ग्रामीण भागातील गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना उपचारासाठी शहराकडे धाव घेण्याची वेळ देणार नाही, हे आरोग्यमंदिर लवकरच जनतेच्या सेवेत येईल, असे प्रतिपादन डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
आमदार यड्रावकर यांनी आज दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत बांधकामाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. याप्रसंगी ते बोलत होते.
सुमारे ७२ गुंठे जागेवर साकारत असलेल्या या रुग्णालयासाठी १६ कोटी १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ५० खाटांच्या या अत्याधुनिक रुग्णालयात स्वतंत्र स्त्रीरोग व पुरुष वॉर्ड, दोन ऑपरेशन थिएटर, तज्ज्ञ डॉक्टरांसाठी कन्सल्टिंग रूम्स, एक्स-रे विभाग, दंत, नेत्र आणि बालरोग विभाग उपलब्ध होणार आहेत. विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी आवश्यक सुविधा आणि उपकरणेही येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
गर्भवती महिलांसाठी विशेष व्यवस्था आणि सुरक्षित प्रसूतीसेवा उपलब्ध होणार असल्याने ग्रामीण भागातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच शवविच्छेदन व एमएलसी सुविधा, महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि RBSK योजनांचा लाभही रुग्णांना मिळणार आहे.
रुग्णालयात आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार सुविधांसोबत महालॅबच्या माध्यमातून विविध वैद्यकीय तपासण्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रक्त, मूत्र आणि अन्य तपासण्यांसाठी नागरिकांना शहरात जाण्याची गरज कमी होणार आहे.
पाहणीदरम्यान आमदार यड्रावकर यांनी बांधकामाची गुणवत्ता, विविध विभागांची रचना आणि उर्वरित कामांचा आढावा घेतला. रुग्णालयाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करून लवकरात लवकर रुग्णसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या.
दत्तवाडसह परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना या रुग्णालयाचा लाभ मिळणार असून, ग्रामीण भागातील नागरिकांना आधुनिक उपचार सुविधा जवळच उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हे रुग्णालय परिसराच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणारे महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.
याप्रसंगी डॉ. स्नेहल व्हटकर, बबनराव चौगुले, बाबुराव पोवार, सरपंच अनिता कडाके, संजय पाटील,नूर काले, बाळासाहेब शिंदे,नाना नेजे, प्रकाश चौगुले, बाळासो कोकणे आदी उपस्थित होते.