विकासासाठी सत्ताधार्यांवर दबाव हवा : डॉ. वसंत भोसले
schedule20 Jan 26 person by visibility 78 categoryसामाजिक
कोल्हापूर : राज्यातील विविध महापालिकांमध्ये विकासाची धोरणे राबविण्यासाठी लोकांनी सत्ताधार्यांवर दबाव आणणे आवश्यक आहे, तरच विकासाची प्रक्रिया गतीमान होईल, असे मत ज्येष्ठ संपादक डॉ. वसंत भोसले यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने आयोजित ‘मनपा निकालांचा अन्वयार्थ’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. प्रकाश पवार होते.
डॉ. भोसले म्हणाले, "गेल्या काही वर्षात शहरीकरण वाढले आहे. वाढत्या शहरांचे नियोजन करण्यात राजकीय व्यवस्था कमी पडली आहे. पुढच्या पंचवीस वर्षांचा विचार करुन शहरांचे नियोजन करणे आवश्यक आहे. तथापि, आपल्याकडे शहरात समस्या निर्माण झाल्यानंतर त्या सोडवण्यावर भर दिला जातो. वास्तविक पाहता समस्या निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
महापालिकांच्या निवडणुकीत शहरी प्रश्नांवर चर्चा झाली नाही. आर्थिक हितसंबंध, भावनिक मुद्दे आणि धार्मिक धु्रवीकरण अशा मुद्यांवर सर्वाधिक भर दिला गेला. लोकशाही व्यवस्था मजबूत होण्यासाठी लोकांच्या जगण्याशी संबंधित मुद्दे राजकीय व्यवस्थेच्या केंद्रस्थानी असणे आवश्यक आहे. परंतु या निवडणुकांत लोकांच्या जिव्हाळ्याचे मुद्दे दुर्लक्षित झाले. ज्या पक्षांना महापालिकेत सत्ता मिळाली आहे, त्या पक्षांकडे तेथील मतदारांनी विकासाचा आग्रह धरला पाहिजे. लोकशाहीत जास्तीत जास्त लोकसहभाग असला पाहिजे आणि लोकांनी विकासाच्या कामासाठी आग्रही असले पाहिजे. तथापि, शहरी मतदार निवडणुकांकडे मनोरंजन म्हणून पाहत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरात विकासाची अपेक्षा व्यर्थ ठरू शकते. या निवडणुकीत लोकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात माध्यमे कमी पडली." असेही त्यांनी नमूद केले.
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. पवार म्हणाले, "शहरातील गरिबांसाठी काम करणारा राजकीय पक्ष उरला नाही. निवडणुकीत पैशांचा आणि अन्य भेटवस्तू तसेच आमिषांचा वापर चिंताजनक आहे. शेतकरी, कामगार आणि गरिब यांच्या जगण्याशी संबंधित प्रश्नांऐवजी निवडणूका धर्माच्या आधारावर लढल्या जात आहेत. शेतकरी, कामगार, गरिब आदी वर्गाचा महाराष्ट्र आता राजकीय पातळीवर धार्मिक गटांत विभागला जात आहे. मतदारांना वस्तुस्थितीपासून दूर नेऊन स्वप्नात गुंतवले जात आहे. क्षणिक मोहाला बळी पडून मतदार मतदान करु लागले तर लोकशाही व्यवस्था धोक्यात येईल."
स्वागत व प्रास्ताविक मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. यावेळी पत्रकारिता व जनसंवाद विभागाचे माजी प्रमुख डॉ. रत्नाकर पंडित, डॉ. सुमेधा साळुंखे यांच्यासह मास कम्युनिकेशन आणि राज्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.