CJP आंदोलन: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर केंद्र सरकारला शनिवारपर्यंतचा अवधी
schedule24 Jul 26 person by visibility 82 categoryदेश
नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि केंद्र सरकार यांच्यात सुरू असलेला गतिरोध सोडवण्यासाठी शुक्रवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली. मोदी सरकारतर्फे जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांनी सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्यासोबत नवी दिल्लीत चर्चा केली. या बैठकीत सरकारने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विचार करण्यासाठी शनिवार दुपारपर्यंतचा वेळ मागितला आहे.
बैठकीनंतर CJP चे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सरकारला निर्णय घेण्यासाठी उद्या दुपारपर्यंतची मुदत दिली असून, ते लवकरच योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान, सीजेपीच्या इतर दोन प्रमुख मागण्यांवर—
* NEET परीक्षा वादात आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक भरपाई देणे आणि,
* आंदोलक विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे व कायदेशीर बाबी मागे घेणे—यावर सरकारने तत्वतः सहमती दर्शवली आहे.
तसेच, शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्यांवर कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्याचे संकेतही सरकारने दिले आहेत. मात्र, असे असले तरी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हाच आमचा मुख्य आणि सर्वात मोठा मुद्दा असल्याचे सीजेपीने ठामपणे सांगितले आहे.
◼️सरकारकडून कारवाईची भीती: अभिजीत दीपके
CJP प्रमुख अभिजीत दीपके यांनी शंका व्यक्त केली आहे की, शनिवार आणि रविवारमुळे आंदोलनात गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार आज रात्रीच आंदोलकांना ताब्यात घेण्याचा किंवा अटक करण्याचा प्रयत्न करू शकते. जर असे घडले, तर ती सरकारची मोठी चूक ठरेल, असा इशारा त्यांनी दिला.
"सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यावर आंदोलन आणखी तीव्र झाले होते, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जमुळे विरोध वाढला होता. तसेच जर आम्हालाही अटक झाली, तर हे आंदोलन संपूर्ण देशभरात अधिक वेगाने पसरेल. त्यामुळे यावर एकमेव उपाय म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा," असे दीपके यांनी स्पष्ट केले.