गडहिंग्लज-आजरा 'बायपास'साठी धनंजय महाडिक संसदेत कडाडले; वाढत्या अपघातांकडे वेधले लक्ष!
schedule12 Mar 26 person by visibility 154 categoryदेश
कोल्हापूर : संकेश्वर ते आंबोली हा नवा कॉंक्रीटचा रस्ता पूर्ण झाला आहे. मात्र हा रस्ता गडहिंग्लज आणि आजरा शहरातून जात असल्याने, वाहतूक कोंडीसह अपघात वाढत आहेत. त्यामुळे या दोन्ही शहरात बाहय मार्ग म्हणजेच बायपास रोड तयार करावेत, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेच्या अधिवेशनात केली. शिवाय कोल्हापूर ते सांगली चार पदरी महामार्गाचे काम गतीने पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली. त्यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी भूमिका स्पष्ट केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांबाबत संसदेच्या अधिवेशनात चर्चा झाली. खासदार धनंजय महाडिक यांनी संकेश्वर,ˆआंबोली,ˆबांदा या नव्या रस्त्याबाबत केंद्र सरकारचे आभार मानले.
संकेश्वर ते आंबोली मार्गे बांदा हा चार पदरी कॉंक्रीटचा रस्ता पूर्ण झाला असला, तरी हा रस्ता गडहिंग्लज आणि आजरा शहराच्या बाजारपेठेतून जातो. त्यामुळे या दोन्ही शहरात वाहतूक कोंडीची समस्या होत असून, अपघातही वाढले आहेत. त्यामुळे गडहिंग्लज आणि आजरा शहरासाठी स्वतंत्र बायपास रस्ता करावा, अशी आग्रही मागणी खासदार महाडिक यांनी केली. त्याला केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी उत्तर दिले. राज्य सरकारमार्फत गडहिंग्लज आणि आजरा शहरांसाठी बायपास निर्माण करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आला आहे. या प्रकल्पासाठी सध्या सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती, नामदार नितीन गडकरी यांनी दिली.
तसेच कोल्हापूर ते सांगली चार पदरी रस्त्याचे काम वेगाने पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा खासदार महाडिक यांनी व्यक्त केली. त्याबद्दलही नामदार गडकरी यांनी माहिती दिली. १ हजार १९२ कोटी रुपयांच्या कोल्हापूरˆ- सांगली रस्त्यासाठी, काही शेतकर्यांनी जमीन संपादनाच्या मुद्द्यावरून आंदोलन केले होते. मात्र जिल्हाधिकार्यांनी त्यावर तोडगा काढला असून, या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, एप्रिल महिन्यात निविदा मंजूर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एप्रिल महिन्यात कोल्हापूर ते सांगली महामार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे.