टी20 वर्ल्ड कप सेमी फायनल : इंग्लंड विरुद्ध अटीतटीच्या लढतीत भारताचा थरारक विजय; आता फायनलमध्ये किवींचे आव्हान!
schedule05 Mar 26 person by visibility 101 categoryक्रीडा
मुंबई : संजू सॅमसनची वादळी फलंदाजी आणि शिवम दुबे-तिलक वर्मा यांच्या षटकारांच्या आतिषबाजीच्या जोरावर भारताने टी 20 वर्ल्ड कप सेमी फायनल मध्ये इंग्लंडचा ७ धावांनी पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. २५३ धावांचा डोंगर उभा करूनही जेकब बेथेलच्या शतकाने भारताच्या गोटात धडकी भरवली होती, मात्र टीम इंडियाने संयम राखत विजय खेचून आणला.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात अडखळत झाली. सलामीवीर अभिषेक शर्मा (९) स्वस्तात बाद झाला. मात्र, संजू सॅमसनला मिळालेल्या जीवदानाचा त्याने पुरेपूर फायदा उठवला. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने संजूचा साधा झेल सोडला आणि तिथूनच सामन्याचे चित्र पालटले. संजूने (८९) इंग्लंडच्या गोलंदाजांची कंबरडं मोडत मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. त्याला इशान किशनने (३९) चोख साथ दिली; या दोघांनी अवघ्या ४५ चेंडूत ९७ धावांची वादळी भागीदारी रचली.
मध्यफळीत शिवम दुबे (४३) आणि तिलक वर्मा (२१) यांनी 'पॉवर हिटिंग'चा नमुना सादर केला. संजू, इशान, दुबे आणि तिलक या चौघांनीही षटकारांची खैरात करत भारताला २० षटकांत ७ बाद २५३ या अवाढव्य धावसंख्येपर्यंत पोहोचवले. इंग्लंडच्या गोलंदाजांकडे भारतीय फलंदाजांच्या या आक्रमणाचे कोणतेही उत्तर नव्हते.
२५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या जेकब बेथेलने एकाकी झुंज दिली. बेथेलच्या तडाखेबंद शतकामुळे सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला. मात्र, ठराविक अंतराने पडणाऱ्या विकेट्स आणि भारतीय गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी दाखवलेला संयम यामुळे इंग्लंडला २० षटकांत ७ बाद २४६ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताने ७ धावांनी हा सामना जिंकून फायनलचे तिकीट बुक केले.
उपांत्य फेरीत इंग्लंडला धूळ चारल्यानंतर आता भारतीय संघाचा सामना ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडशी होणार आहे. मायदेशात होणाऱ्या या अंतिम सामन्यात भारत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.