कोल्हापूरात २१ व २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन
schedule19 Mar 26 person by visibility 108 categoryराज्य
कोल्हापूर : शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यामध्ये दिनांक २१ व २२ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत राजारामपुरी येथील व्ही. टी. पाटील स्मृती सदन येथे जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे दिली आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन २१ मार्च रोजी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या निमित्ताने पौष्टिक तृणधान्य व गळीतधान्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी २२ मार्च रोजी कृषी विभागातर्फे एका विशेष 'पौष्टिक तृणधान्य रॅली'चे आयोजनही करण्यात आले आहे.
▪️धान्य महोत्सवातील प्रमुख आकर्षणे
धान्य महोत्सवामध्ये ग्राहकांना शेतकऱ्यांकडून अस्सल ग्रामीण शुद्धतेचे धान्य आणि ओडीओपी (ODOP) व जीआय (GI) मानांकन प्राप्त दर्जेदार शेतीमाल खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. प्रामुख्याने कोल्हापूरचा सेंद्रिय गूळ, काकवी, पाटगावचा मध, आजरा घनसाळ आणि विविध प्रकारचे तांदूळ थेट विक्रीसाठी उपलब्ध असतील.
इतर जिल्ह्यांतील प्रसिद्ध शेतीमालही ग्राहकांना एकाच ठिकाणी मिळणार आहे. बार्शीची ज्वारी, सोलापूरची डाळिंब, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, सांगलीची द्राक्षे, सिंधुदुर्ग व रत्नागिरीचा हापूस आंबा रेठरेचा इंद्रायणी तांदूळ आणि पुणे-पुरंदरचे अंजीर यांचा समावेश असेल. महोत्सवामध्ये बचत गटांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले 'रेडी टू सर्व्ह' खाद्यपदार्थ आणि कृषी विभागाच्या विविध प्रकल्पांतर्गत तयार झालेले प्रक्रियायुक्त पदार्थही ग्राहकांना पाहण्यासाठी, खरेदी करण्यासाठी आणि खाण्यासाठी उपलब्ध करून दिले जातील.
▪️महिला बाईक रायडर्सची बाईक रॅली
२२ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता धान्य महोत्सवाचे औचित्य साधून आणि 'आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षा'निमित्त शहरात एका विशेष 'पौष्टिक तृणधान्य बाईक रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे. ही बाईक रॅली प्रामुख्याने महिला बाईक रायडर्सची असणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पौष्टिक तृणधान्य व गळीतधान्याच्या वापराबाबत जनजागृती निर्माण करणे आणि महिला शेतकऱ्यांचा विशेष सन्मान करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. बाईक रॅली दसरा चौक पासून बिंदू चौक,उमा थिएटर चौक, बागल चौक, जनता बाजार चौक, व्ही. टी. पाटील स्मृती भवन येथे समारोप होईल.
शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे सर्व कोल्हापूरकरांनी २१ आणि २२ मार्च रोजी या धान्य महोत्सवाला मोठ्या संख्येने भेट देऊन दर्जेदार शेतीमालाची खरेदी करावी आणि या उपक्रमास उदंड प्रतिसाद द्यावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी आपला दर्जेदार शेतीमाल या प्रदर्शनात विक्रीसाठी आणावा, तसेच महिला शेतकऱ्यांचा सन्मान आणि आरोग्यासाठी पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या रॅलीला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.