आजचा विद्यार्थी हा उद्याचा सक्षम, सुजाण नागरिक : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर; शिरोळ तालुक्यात नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
schedule15 Jun 26 person by visibility 85 categoryशैक्षणिक
शिरोळ : जिल्हा परिषद शाळेतील प्रत्येक विद्यार्थी गुणवत्ताधारक, संस्कारक्षम आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी होणारा नागरिक बनावा यासाठी राज्य शासन विविध शैक्षणिक उपक्रम प्रभावीपणे राबवत आहे. विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न शिक्षण मिळावे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व्हावा आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन कटिबद्ध असून यापुढेही शिक्षण क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
शिरोळ तालुक्यातील नांदणी आणि कुरुंदवाड येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये आयोजित प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थी स्वागत समारंभात ते बोलत होते. शिरोळ तालुक्यातील १५३ प्राथमिक शाळेतील १०१६ विद्यार्थी व १११६ विद्यार्थीनी असे एकुण २१३२ विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेश घेतला. यावेळी शाळा परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, शैक्षणिक साहित्य व टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले की, आजचा विद्यार्थी हा उद्याचा सक्षम, सुजाण आणि जबाबदार नागरिक असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील ज्ञान न देता त्यांच्यामध्ये नैतिक मूल्ये, सामाजिक जाणीव, शिस्त आणि नेतृत्वगुण विकसित करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्षमता असून योग्य मार्गदर्शन आणि सुविधा मिळाल्यास ते कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत असून तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होणे आवश्यक आहे. डिजिटल शिक्षण, स्मार्ट क्लासरूम, ई-लर्निंग यांसारख्या सुविधांमुळे शिक्षण अधिक परिणामकारक होत आहे. प्रत्येक जिल्हा परिषद शाळा आधुनिकीकरणाच्या दिशेने वाटचाल करत असून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे.
ग्रामीण भागातील शाळांमध्ये दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे आणि शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम करणे यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांमध्येही सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रवेशोत्सवानिमित्त शाळांमध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
यावेळी रामचंद्र डांगे, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, नगरसेवक जय कडाळे, अक्षय आलासे, जवाहर पाटील, रामचंद्र मोहिते, अजित देसाई मुख्याध्यापक रविकुमार पाटील तर नांदणी येथील प्रवेशोत्सव प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सानिका पाटील यड्रावकर, जिल्हा परिषद सदस्या प्रचिता कोळी, संजय बोरगावे, संजय कुरडे, सागर शंभुशेटे, गटशिक्षणाधिकारी सौ.भारती कोळी,शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत,अनिल ओमासे सर्व केंद्रप्रमुख, सर्व शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते.