‘गोकुळ’वर शेतकऱ्यांचाच ताबा राहणार; कोल्हापूरच्या अस्तित्वाची आणि स्वाभिमानाची' लढाई : सतेज पाटलांचा एल्गार!
schedule30 Jun 26 person by visibility 199 categoryउद्योग
कोल्हापूर: "गोकुळ दूध संघ हा कोल्हापूरच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा विषय आहे. तो कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहील," असा आक्रमक पवित्रा घेत विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आगामी 'गोकुळ' पंचवार्षिक निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. आज मंगळवारी (दि. ३० जून) राजर्षी छत्रपती शाहू समविचारी आघाडीच्या वतीने सभासद संस्थांच्या प्रतिनिधींच्या नावांचे ठराव मोठ्या शक्तिप्रदर्शनासह दाखल करण्यात आले, ज्यामुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे.
मेळाव्याला मार्गदर्शन करताना आमदार सतेज पाटील यांनी मागील काळातील कामाचा लेखाजोखा मांडला. "दहा वर्षांपूर्वी आम्ही दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी खरेदी दरात मोठी वाढ केली. प्रति लिटर दूध दरात १० रुपयांवरून थेट १४ रुपयांपर्यंत वाढ करून शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो," असे सांगत त्यांनी संघाचा केंद्रबिंदू 'दूध उत्पादक शेतकरी'च असल्याचे अधोरेखित केले.
सतेज पाटील यांनी दूध संघाच्या धोरणांवर भाष्य करताना स्पष्ट केले की, दुधाच्या पिशवी पॅकिंगचे काम खाजगी संस्थांना देण्याऐवजी 'गोकुळ' स्वतःच करत आहे. यामुळे होणारा नफा थेट उत्पादकांच्या खिशात जाईल. ही भूमिका शेतकऱ्यांच्या हिताची असून, संघाच्या प्रक्रियेत आणि तंत्रज्ञानात केलेली मोठी गुंतवणूक ही भविष्यातील प्रगतीचा पाया असल्याचे त्यांनी नमूद केले.
"स्थानिक दूध संस्था सक्षम असतील, तरच 'गोकुळ' बळकट होईल," असे सांगत त्यांनी या निवडणुकीला केवळ प्रशासकीय लढाई न मानता 'कोल्हापूरच्या अस्तित्वाची आणि स्वाभिमानाची' लढाई असल्याचे म्हटले आहे. आजच्या शक्तिप्रदर्शनाने समविचारी आघाडीने आपले वर्चस्व दाखवून दिल्याने, विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
◼️गोकुळवर प्रशासक नेमणे हे षडयंत्र; संस्था ताब्यात घेण्याचा सरकारचा प्रयत्न - माजी खासदार राजू शेट्टी यांचा आरोप
कोल्हापूर: गोकुळ दूध संघावर प्रशासक नेमणे हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असून, हे दूध संघ ताब्यात घेण्याचे सरकारचे मोठे षडयंत्र असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. कोल्हापूर येथे आयोजित सभासदांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली.
प्रशासकाच्या माध्यमातून गोकुळचा कारभार चालवणे हे केवळ संस्था आपल्या ताब्यात घेण्याच्या हेतूने केले जात आहे, असा आरोप करत त्यांनी सरकारला धारेवर धरले. गोकुळ ही संस्था कोल्हापूरच्या अस्मितेचा भाग असून, त्यावर प्रशासक नेमणे म्हणजे संस्थेच्या स्वायत्ततेवर घाला असल्याचे शेट्टी म्हणाले.
या मेळाव्यात जिल्ह्यातील संस्था ठरावधारक, शेतकरी, नेते, कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.