अभ्यासाचे नियोजन, सातत्य आणि वेळेचे व्यवस्थापन स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे: जयश्री गायकवाड
schedule19 Aug 26 person by visibility 51 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : अभ्यासाचे योग्य नियोजन, सातत्य, संदर्भ साहित्याचे सखोल आकलन, वेळेचे व्यवस्थापन आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा नियमित सराव हे स्पर्धा परीक्षेतील यशाचे महत्त्वाचे घटक आहेत, असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी सोमवारी (दि. १७) येथे केले.
शिवाजी विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने “स्पर्धा परीक्षा: यशाची गुरूकिल्ली, करिअरच्या सुवर्णसंधी आणि प्रभावी तयारी” या विषयावर श्रीमती गायकवाड यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
आपल्या मार्गदर्शनात श्रीमती गायकवाड यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आवश्यक असलेल्या विविध बाबींविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, एकाच विषयासाठी अनेक पुस्तके वाचून द्विधा मनःस्थिती करून घेण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी एकच चांगले पुस्तक निवडून त्याचा सखोल आणि सर्वंकष अभ्यास करणे अधिक उपयुक्त ठरेल. पुस्तके बदलत राहण्यापेक्षा मूलभूत संकल्पना स्पष्ट समजून घेणे आणि त्या आत्मसात करणे यावर अभ्यासाचा भर असला पाहिजे. पुस्तकाचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडविणे, त्यांचे विश्लेषण करणे आणि त्यानुसार अभ्यासाची दिशा निश्चित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थिनींना व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात समतोल कसा साधावा, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
प्रारंभी केंद्राच्या समन्वयक डॉ. कविता वड्राळे यांनी स्वागत व परिचय करून दिला. कार्यक्रमास डॉ. सचिन भोसले, डॉ. मयुरेश पाटील यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
◼️विद्यार्थिनी वसतिगृहात सायबर साक्षरतेविषयी मार्गदर्शन
दरम्यान, शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनी वसतिगृहात पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांचे ‘महिला सुरक्षा व सायबर साक्षरता’ या विषयावर विशेष व्याख्यान झाले. दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या सहकार्याने झालेल्या या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते. यावेळी वसतिगृह अधीक्षक डॉ. माधुरी वाळवेकर, दूरशिक्षण केंद्र संचालक डॉ. प्रतिभा पाटणकर, डॉ. कविता वड्राळे, डॉ. नीलांबरी जगताप, डॉ. नगिना माळी यांच्यासह विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या