आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका महाविकास आघाडी म्हणून लढणार : माजी खासदार विनायक राऊत
schedule08 Nov 25 person by visibility 61 categoryराजकीय
कोल्हापूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकसंघपणे लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे. “निवडून येण्याची क्षमता हेच निकष ठरवून उमेदवारी देऊ आणि एकत्रितपणे आघाडी म्हणून मैदानात उतरू” असा ठाम निर्धार आज कोल्हापूरमध्ये पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत करण्यात आला. माजी खासदार विनायक राऊत आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार सुनिल प्रभू यांच्या उपस्थितीत अजिंक्यतारा कार्यालयात ही बैठक झाली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची अजिंक्यतारा कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीत आघाडी म्हणून एकत्र लढायचे आणि सक्षम उमेदवारालाच उमेदवारी द्यायचा निर्णय घेण्यात आला.
माजी खासदार विनायक राऊत यांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या रूपातच लढण्याचे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी सरकारला सत्तेतून दूर करण्यासाठी या निवडणुकीत एकत्रित लढणे निर्णायक ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले.
आमदार सतेज पाटील यांनी, काही ठिकाणी आघाडीचे चिन्ह वापरून, तर काही ठिकाणी पक्षाच्या चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला जाईल असे सांगितले. सध्या प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असून सर्व प्रश्न मार्गी लावून महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाऊ, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
आमदार सुनील प्रभू यांनी, आघाडीतील सर्व घटकांनी परस्पर समन्वय साधून उमेदवार ठरवावेत आणि निवडणुका जिंकण्यासाठी एकजूट दाखवावी असे सांगितले. माजी आमदार राजीव आवळे यांनी, पक्षापेक्षा आघाडीला प्राधान्य देऊन सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा घेणे आणि एकसंघपणे लढणे गरजेचे आहे असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यांनी, आता महाविकास आघाडीच्या छताखाली एकजूट दाखवणे आवश्यक आहे. राज्यातील नेत्यांनी वारंवार जिल्हा आणि तालुका स्तरावर बैठका घेऊन कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा, असं आवाहन त्यांनी केले.
बैठकीत शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पवार, अनिल घाटगे यांच्यासह इतर नेत्यांनीही आपली मतं व्यक्त केली.
या बैठकीला शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, नितीन बानुगडे- पाटील, शिवसेना उपनेते संजय पवार, जिल्हाध्यक्ष विजय देवणे, शहराध्यक्ष रविकिरण इंगवले, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्हीबी पाटील, माजी आमदार राजीव किसन आवळे, सुनिल शिंत्रे, वैभव उगळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील मोदी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष आर के पोवार, राजू लाटकर, आनंद माने, बाळासाहेब सरनाईक, प्रवीण केसरकर, सुभाष बुचडे, संजय मोहिते, दुर्वास कदम, मधुकर रामाणे, भारती पोवार, बयाजी शेळके, शिवसेनेचे नवेज मुल्ला सुनील शिंदे, संजय चौगुले, राष्ट्रवादीचे अनिल घाटगे, निरंजन कदम, नवेज मुल्ला, रावसाहेब भिलवडे, अवधूत साळोखे, विराज पाटील आदी उपस्थित होते.