इचलकरंजीसह परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करु : मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस; ७१३ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन, प्रारंभ, लोकार्पण
schedule23 May 25 person by visibility 155 categoryराज्य

इचलकरंजी : शहरांच्या विकासाच्या योजनांसाठी राज्य शासन कटिबद्ध असून लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सर्व प्रस्तावांना न्याय देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्याअनुषंगाने इचलकरंजीच्याही विकासासाठी सर्वतोपरी मदत करु, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. त्यांच्याहस्ते इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील 713 कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचे उद्घाटन, प्रारंभ व लोकार्पण संपन्न झाले.
यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, आमदार शिवाजीराव पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.शशिकांत माहुरकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, उप विभागीय अधिकारी इचलकरंजी मोसमी चौगुले उपस्थित होत्या. यावेळी पालकमंत्री व जिल्ह्याधिकाऱ्यांनी त्यांना करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची प्रतिमा भेट दिली.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शहापूर पोलीस स्टेशनच्या कोनशिलेचे अनावरण झाले, तसेच त्यांनी नूतन इमारतीची पाहणीही केली. उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले, इचलकरंजी व परिसराच्या विकासाबद्दल जे काही प्रस्ताव येतील त्याला तातडीने मान्यता देण्यात येईल. यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे कौतुकही त्यांनी केले. यावेळी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील 713 कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचे ऑनलाईन उद्घाटन, शुभारंभ व लोकार्पण झाल्याची घोषणा त्यांनी केली.
यात 130.60 कोटी रुपयांच्या केंद्र शासन पुरस्कृत लघु व मध्यम नगरांसाठी नागरी पायाभूत सुविधा विकास योजना (UIDSSMT) अंर्गत इचलकरंजी शहरातील वाढीव कबनूर व शहापूर भागासाठी भूयारी गटार योजना राबविणे व 18 द.ल.ली. क्षमतेचे मलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण, 488.67 कोटी रुपयांच्या नगरोत्थान महाभियान अंतर्गत अस्तित्वातील भूयारी गटार योजनेचे बळकटीकरण करणे व योजना विकसित करणे या कामाचे उद्घाटन, 31.37 कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शहरात विविध ठिकाणी एकूण सहा पाण्याच्या टाक्या उभारणे, पंपिंग मशीन तसेच दाबनलिका टाकणे इ. कामांचे उद्घाटन, 59 कोटींच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 10 रस्ते कामांचे भूमिपूजन, 4 कोटींच्या शहापूर पोलीस स्टेशनचे उद्घाटन, तसेच इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन करण्यात आले.
आमदार राहुल आवाडे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात गत सहा महिन्यात आपण केलेल्या विकासकामांचा आढावा घेतानाच तहानलेल्या वस्त्रनगरीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न योग्य तो निर्णय घेऊन कायमस्वरुपी सोडवावा, वस्त्रनगरीतील वस्त्रोद्योगाला भेडसावणारा वीज आणि दराचा प्रश्न संपुष्टात येण्यासाठी इचलकरंजीला सोलर सिटी बनवावे, कोल्हापूर सांगली व सातार या तिन्ही जिल्ह्यांसाठी धोकादायक असलेल्या महापूराचा प्रश्न संपुष्टात येण्यासाठी अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला विरोध दर्शवावा आदी मागण्या करतानाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत स्वबळावर लढण्याची परवानगी द्यावी असे सांगत प्रामाणिकपणे राबणार्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासह पहिला महापौर हा भाजपाचा असेल अशी ग्वाही दिली.
भाजपा प्रदेशाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी, दिला शब्द पाळणारा असा मुख्यमंत्री असून अवघ्या सहा महिन्यातच तिबल इंजिन सरकारची ताकद इचलकरंजीतील विकासकामांच्या माध्यमातून दाखवून दिली आहे. सहा महिन्यात 750 कोटीचा निधी आणून राहुलने विकासगंगा आणत माझ्या आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनाही मागे टाकले आहे. सतत भेडसावणारा वीजेचा प्रश्न कायमस्वरुपी संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्राला सोलरचे राज्य बनवावे. तर इचलकरंजीचा पहिला महापौर हा भाजपाचा करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून भाजपाला एक नंबरची पार्टी करण्यासाठी जीवाचे रान करुया. कोल्हापूर जिल्ह्यात सगळीकडे कमळ फुलवूया असे आवाहन केले.
माजी वस्त्राद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी, इचलकरंजीला सातत्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सतावत असून शासनाने मंजूर केलेल्या सुळकूड उद्भव दुधगंगा योजनेला विरोध होत असल्याने ती थांबली आहे. कोणताही वाद अथवा विरोध होणार नाही यावर तोडगा असल्याचे सांगत रेंदाळपर्यंत आलेल्या कालव्यातून दुधगंगेचेच पाणी इचलकरंजीसाठी येणार आहे. त्यामुळे हा तोडगा मान्य करुन पाणी प्रश्न सोडवावा अशी मागणी करत विरोधाला चाप लावण्याची गरज असल्याचे सांगत मुख्यमंत्री सर्वच प्रश्न सोडवतील, असे सांगितले. इचलकरंजीला सोलर सिटी करा म्हणजे इचलकरंजी एक्स्पोर्टचे जगातील पहिल्या क्रमांकाचे शहर बनेल अशीही मागणी केली
याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेतील 4 हजार 200 लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप तर 5 हजार बांधकाम कामगारांना भांडी व इतर साहित्य वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी काही लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात मंजुरी पत्राचे व साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमानंतर शहरातील श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेस सदिच्छा भेट दिली.