शाश्वत कृषी विकासासाठी विविध विद्याशाखांत समन्वय आवश्यक : डॉ. ज्योती जाधव
schedule11 Feb 26 person by visibility 154 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शाश्वत कृषी विकासासाठी हवामान, पर्यावरण आणि संख्याशास्त्र या विविध विद्याशाखांमध्ये संतुलित समन्वय महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाचा संख्याशास्त्र अधिविभाग आणि शाश्वत विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “दिवंगत डॉ. सुलोचना गाडगीळ आणि डॉ. माधव गाडगीळ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शाश्वत कृषीसाठी हवामान, पर्यावरण व सांख्यिकी” या पीएम-उषा पुरस्कृत कार्यशाळा सोमवारी (दि. ९) झाली. यावेळी उद्घाटन समारंभामध्ये डॉ. जाधव बोलत होत्या.
प्र-कुलगुरू डॉ. जाधव म्हणाल्या, शाश्वत शेती, पर्यावरणीय समतोल आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आंतरविद्याशाखीय संशोधनाची नितांत आवश्यकता आहे. सांख्यिकी, जीवनविज्ञान, पर्यावरणशास्त्र आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा समन्वय भविष्यातील संशोधन कार्यामध्ये अतिशय मोलाची भूमिका बजावणार आहे.
कार्यशाळेचे संसाधन व्यक्ती डॉ. अनिल गोरे यांनी हवामानविषयक माहिती, पर्जन्यमानाचे विश्लेषण आणि कीड-रोग नियंत्रणासाठी सांख्यिकी पद्धतींचा उपयोग यावर सविस्तर मार्गदर्शन केले. महाराष्ट्रातील पावसावर अवलंबून शेती, पिकांवरील कीड व बुरशीजन्य रोग, तसेच रासायनिक कीटकनाशकांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी डेटा-आधारित निर्णय प्रणाली या विषयांवर कार्यशाळेत सखोल चर्चा झाली.
कार्यशाळेस संख्याशास्त्र, वनस्पतिशास्त्र, पर्यावरणशास्त्र, प्राणीशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील पदव्युत्तर विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या आयोजनासाठी अधिविभाग प्रमुख डॉ. शशीभूषण महाडिक, डॉ. सोमनाथ पवार, सुकुमार राजगुरू आणि डॉ. सचिन पाटील यांनी परिश्रम घेतले.