कोल्हापूर ते वैभववाडी नवा मार्ग आणि कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, अशा दोन्ही कामांना वेग देण्याची खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी
schedule05 Dec 25 person by visibility 69 categoryराज्य
कोल्हापूर : नवी दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. आज खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्गाची अंमलबजावणी आणि कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण अशा दोन मुद्दयांना वाचा फोडली. दोन्ही कामे गतीने पूर्ण व्हावीत, त्यातून कोल्हापूरच्या व्यापार, उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल, असे त्यांनी नमुद केले.
नवी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात आज राज्यसभेत बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी रेल्वेविषयक मुद्दे उपस्थित केले.
कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि कोल्हापूर -वैभववाडी मार्ग, याबाबत मंजूरी मिळाली आहे. सध्या कोल्हापूर - मिरज हा ५० किलोमीटरचा एकेरी रेल्वे मार्ग असून, त्यामुळे नवीन गाड्या सुरू करणे शक्य होत नाही. पुणे ते बेंगलोर या अधिक लांबीच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले, तरी कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे काम प्रलंबित आहे. त्यातून कोल्हापूरच्या औद्योगिक, आर्थिक आणि पर्यटन विकासाला अडथळा येत असल्याचे खासदार महाडिक यांनी नमुद केले.
तसेच कोल्हापूर ते वैभववाडी या रेल्वे मार्गाला, सन २०१७ च्या रेल्वे अंदाजपत्रकात ३५० कोटींची तरतुद झाली. या मंजूर प्रकल्पाचा विकास आराखडा तयार आहे. कोल्हापूर ते वैभववाडी या रेल्वे मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र कोकणाशी जोडला जाईल. तसेच देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्ट्यांना रेल्वेमार्गानं जोडणारा हा महत्त्वपूर्ण दुवा ठरेल, असे त्यांनी नमुद केले. त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प गतीमान पध्दतीने पूर्ण व्हावेत, अशी अपेक्षा महाडिक यांनी सभागृहात बोलून दाखवली.