कल्पनेपासून उद्योगापर्यंत: केआयटी-आयआरएफच्या कार्यशाळेत नवउद्योजकांना मिळाला यशाचा मूलमंत्र!
schedule04 Sep 26 person by visibility 37 categoryशैक्षणिक
कोल्हापूर: जागतिक उद्योजक दिनानिमित्त केआयटी इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन (केआयटी-आयआरएफ) तर्फे ‘कल्पनेपासून उद्योगापर्यंत – आपल्या कल्पनेचे यशस्वी उद्योगात रूपांतर’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोल्हापूर येथे करण्यात आले. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत झालेल्या कार्यशाळेत स्टार्टअप संस्थापक, उद्योजक, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व इनोव्हेटर्सचा उत्स्फूर्त सहभाग होता.
डॉ. मोहन वनरोट्टी अध्यक्ष, संचालन मंडळ तसेच डीएसटी निधी आय-टीबीआय व एमएसआयएनएसचे प्रमुख अन्वेषक व संचालक केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या मार्गदर्शनाने कार्यशाळेची सुरुवात झाली. कल्पना सुचणे ही उद्योजकतेची केवळ सुरुवात असून, त्या कल्पनेला बाजारपेठेतील गरजेशी जोडणे, तिचे मूल्य निर्माण करणे आणि सातत्याने प्रयत्न करून ती प्रत्यक्ष उद्योगात रूपांतरित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी मार्गदर्शनातून स्पष्ट केले.
सुधीर आरळी,मुख्य कार्यकारी अधिकारी, केआयटी-आयआरएफ, समीर पुनस्कर, देवेंद्र पाठक आणि कंपनी सेक्रेटरी प्रदीप रासनकर यांनी उद्योजकीय परिसंस्था, ग्राहक व बाजारपेठेचे मूल्यांकन, व्यवसाय प्रारूप, उद्योग नियोजन, गुंतवणूक आणि उद्योग सुरू करण्याच्या कृती आराखड्याबाबत मार्गदर्शन केले.
सहभागींना कल्पना, ग्राहक, बाजारपेठ, व्यवसाय प्रारूप, उद्योग नियोजन, गुंतवणूक, उद्योग प्रारंभ आणि प्रत्यक्ष कृती या टप्प्यांद्वारे कल्पनेपासून उद्योगापर्यंतचा व्यावहारिक प्रवास समजावून देण्यात आला. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रश्नोत्तर, विचारांची देवाणघेवाण, संपर्क-विस्तार आणि कॅम्पस भेट यामुळे कार्यशाळेला व्यावहारिक स्वरूप प्राप्त झाले.
समारोपावेळी मयसभा एक्सआर टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक अक्षय जोशी यांनी कार्यपद्धतीतील उत्कृष्टता, लीन उत्पादन पद्धती, सिक्स सिग्मा, नवकल्पना, सातत्यपूर्ण सुधारणा तसेच संवर्धित वास्तव, आभासी वास्तव आणि विस्तारित वास्तव तंत्रज्ञानातील संधींबाबत मार्गदर्शन केले.
कार्यशाळेतील सर्व सहभागींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
केआयटी संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन आणि सचिव दीपक चौगुले यांनी केआयटी-आयआरएफ टीमचे अभिनंदन केले. नवकल्पना, स्टार्टअप संस्कृती आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी अशा परिणामाभिमुख उपक्रमांची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.