कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून राजारामपुरी येथील वालावलकर प्रशालेजवळ पंकज निवास भोसले (वय ३२, मूळ रा. कनाननगर, सध्या रा. राजारामपुरी) याचा दगडाने ठेचून चौघांनी खून केला. खुनाची घटना मंगळवारी दि. २ रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली.
हल्लेखोरांमध्ये तीन सख्ख्या भावांसह चौघांचा समावेश आहे. राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळावरून गणेश विक्रम काटे (वय ३०) आणि नीलेश विक्रम काटे (वय २७, दोघे रा. कनाननगर) या भावांना ताब्यात घेतले, तर उमेश विक्रम काटे आणि अमित गायकवाड (दोघे रा. कनाननगर) हे पसार झाले.
कनाननगर येथील पंकज भोसले हा राजारामपुरीतील मनीष संबरगे यांच्याकडे कारचालक म्हणून काम करीत होता. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास तो कार घेऊन संबरगे यांच्या घरी पोहोचला. कार पार्क केल्यानंतर बाहेर रस्त्यावर थांबलेल्या चौघांनी पंकज याला बोलावून घेतले. काही अंतर बोलत गेल्यानंतर पाठीमागून एकाने पंकज याच्या डोक्यात काठी मारली. जीव वाचविण्यासाठी पंकज धावत सुटला. मात्र, कर्णिक पथ चौकात त्याला पाडून चौघांनी हल्ला केला. मारामारीचा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी राजारामपुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली होती. त्यामुळे तातडीने घटनास्थळी पोहोचलेले त्यांनी गणेश काटे आणि नीलेश काटे या दोन हल्लेखोरांना पकडले. हल्लेखोर उमेश काटे आणि अमित गायकवाड हे दोघे दुचाकीवरून निघून गेले. पोलिस त्यांचा शोध घेत आहे.
गंभीर जखमी अवस्थेतील भोसले याला पोलिसांनी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.