ज्ञानज्योती शुभांगीताई गावडे यांच्या जयंतीनिमित्त विविध माध्यमिक विद्यालयांमध्ये वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्य वाटप
schedule30 Jul 26 person by visibility 165 categoryशैक्षणिक
◼️डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचा समाजोपयोगी उपक्रम
कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (कोल्हापूर) यांच्या वतीने संस्थेच्या दिवंगत सचिव ज्ञानज्योती प्राचार्या शुभांगीताई गावडे यांच्या ५४ व्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत वृक्षसंवर्धन व शिक्षणप्रेमाचा संदेश देणारा विशेष उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी आणि रजिस्ट्रार अमित आवाड यांनी श्री हरेश्वर माध्यमिक विद्यालय (आरे), मातोश्री जिजाबाई हायस्कूल (माजगाव), आदर्श हायस्कूल (भामटे) आणि श्री रामचंद्र पवार हायस्कूल (परखंदळे) येथे भेट देऊन वृक्षारोपण केले. तसेच, इन्स्टिट्यूटच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आगामी शैक्षणिक वाटचालीस उपयुक्त ठरणारे शालेय साहित्य भेट दिले. याप्रसंगी प्रा. सुशील मगदूम, प्रा. प्रवीण भट, प्रा. हेमंत कुंभार आदी उपस्थित होते.
प्रत्येक शाळेत कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्ञानज्योती शुभांगीताई गावडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेत वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला.
यावेळी प्राचार्य विरेन भिर्डी मनोगतात म्हणाले की, "विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन केल्यास पर्यावरण संवर्धनाला मोठी चालना मिळेल. शिक्षण, संस्कार आणि पर्यावरण यांचा समन्वय साधणारे असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरतात. ज्ञानज्योती सौ. शुभांगीताई गावडे यांचा ज्ञानदानाचा आणि सामाजिक बांधिलकीचा संस्कार हाच अखंड उन्नतीचा मार्ग आहे". उपस्थितांनी इन्स्टिट्यूटच्या या उपक्रमाचे मनापासून स्वागत करून कौतुक केले.
संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे या उपक्रमासाठी मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी हायस्कूलमधील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इन्स्टिट्यूटच्या वतीने भविष्यातही अशाच समाजहिताच्या उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.