भारतात दरवर्षी १६ मार्च रोजी राष्ट्रीय लसीकरण दिवस साजरा केला जातो. एकेकाळी जीवघेण्या ठरणाऱ्या रोगांचे उच्चाटन करण्यासाठी लस महत्त्वाची भूमिका बजावते. हे आता सिद्ध झाले आहे. काही दशकांपूर्वी जगभरात पोलिओ आणि देवीसारखे आजार मोठ्या प्रमाणात पसरले होते आणि या रोगांवर लसीकरण होईपर्यंत बऱ्याच जणांना प्राण ही गमवावे लागले होते. त्यानंतर जगातील सर्व लोकांसाठी लसीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. लसीकरणामुळे गंभीर व जीवघेण्या आजारांचा धोका न पत्करता चांगले आयुष्य जगता येते, हे आता वैज्ञानिकांनी व संशोधकांनी सिध्द केले आहे. त्यामुळे स्वत:ला सुरक्षित आणि निरोगी ठेवण्यासाठी लस घेणे , हे अनिवार्य आहे.
अलिकडेच जगभरात कोरोना तथा कोविडच्या जीवघेण्या साथीने हाहाकार माजवला होता, जगभरात कोरोना विषाणूंमुळे २६ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आधुनिक काळात लसीकरणाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
भारतातील फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्स, डॉक्टर्स आणि नर्स वर्षभर अथक परिश्रम घेऊन लसीकरणाची मोहीम राबविण्यात अग्रेसर असतात. लस घेतल्यामुळे तंदुरुस्त आणि निरोगी असल्याची खात्री ते देत असतात. योग्य प्रकारे लस दिली जाते का, याची खात्री ते करतात. लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी दरवर्षी १६ मार्च रोजी राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा केला जातो.
१९८८ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जागतिक पोलिओ निर्मूलन उपक्रमाची सुरुवात करून पृथ्वीवरून या रोगाचे उच्चाटन करण्यासाठी पहिले पाऊल म्हणून सुरु केले. १९९५ साली याच दिवशी भारत सरकारने पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेऊन देशातून या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी पहिला प्रयत्न म्हणून पोलिओ लसीकरण मोहीम सुरू केली. तेव्हापासून १६ मार्च हा दिवस राष्ट्रीय लसीकरण दिन म्हणून साजरा केला जातो.
खरं तर १६ मार्च या राष्ट्रीय लसीकरण दिनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या दिवशी संसर्गजन्य आणि प्राणघातक आजारांपासून सर्वांना योग्य प्रकारे लस मिळावी यासाठी सरकारी आणि अशासकीय संस्था लसीकरण मोहीम राबवतात. लहान मुले आणि प्रौढ दोघांसाठीही लसीकरणाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढविणे हे या दिवसाचे उद्दीष्ट आहे. प्राणघातक आजारांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी लोकांना लस घेण्याचे महत्त्व पटवून देणे हे देखील त्याचे उद्दीष्ट आहे. आरोग्याच्या अनेक समस्यांचा फैलाव टाळण्यासाठी वेळेवर आणि संपूर्ण लसीकरण आवश्यक आहे. या दिवशी लसीकरण संदर्भातील गैरसमजही दूर केले जातात.
भारतात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सक्षमपणे राबविण्यात आल्याने हळूहळू पोलिओचे प्रमाण कमी झाले, आणि अखेर आता भारताने पोलिओवर बऱ्यापैकी मात केली आहे.२०१४ मध्ये तर भारत पोलिओमुक्त देश म्हणून घोषित करण्यात आला. हे केवळ लसीकरणामुळे शक्य झाले आहे.
गेल्या काही दशकांपासून धोकादायक आजारांशी लढण्यासाठी लसीकरणाची तीव्र गरज बनली आहे.यामुळे पोलिओ, टी.बी., धनुर्वात, गोवर,हिपॅटायटस बी यांसारख्या गंभीर आजारांपासून लक्षावधी लोकांचा बचाव झाला आहे. लसीकरणाची मोहीम यशस्वीपणे राबविल्याने विविध प्राणघातक आजारांपासून संरक्षण करण्यासाठी लसीची क्षमता सिद्ध झाली आहे.
जगभरातील सर्व लोकांना लसीकरणाचे महत्त्व ज्ञात झाले आहे. विशेषतः कोविडच्या प्राणघातक साथीने संपूर्ण जग हादरून गेले होते, त्या काळात कोविडप्रतिबंधक लसीचे महत्त्व प्रकर्षाने लक्षात आले. प्राणघातक व धोकादायक आजार रोखण्यासाठी लस हा प्रभावी उपाय आहे.आज, जगभरात मोठ्या प्रमाणात राबविण्यात आलेल्या लसीकरण मोहीमेमुळे पोलिओ, गोवर, टिबी, यांसारख्या अत्यंत संसर्गजन्य आजार नष्ट करण्यात आपल्याला यश आले आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार दरवर्षी लसीकरण मोहीमेमुळे २-३ दशलक्ष लोकांचे जीव वाचत आहेत. हे लसीकरणाचे लक्षणीय यश आहे.
✍️ डॉ. सुनीलकुमार सरनाईक.
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत )