वारीच्या सेवेतून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; पंढरपुरात 'निर्मलवारी-समृद्धवारी' व 'चरणसेवा' उपक्रमाचा समारोप संपन्न
schedule24 Jul 26 person by visibility 79 categoryराज्य
पंढरपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती पंढरपूर येथे ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या ‘चरणसेवा’ उपक्रमाचा समारोप संपन्न झाला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.
चरणसेवा उपक्रमाद्वारे डॉक्टर व स्वयंसेवकांनी भक्तीभावाने वारकऱ्यांची सेवा केली. वारकऱ्यांच्या या सेवाभावातून भारताची युवा शक्ती, तसेच महाराष्ट्र धर्माचे खरे दर्शन घडते, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. पुरोगामी महाराष्ट्रात वारकऱ्यांसाठी सुविधा पुरवणे शासनाचे कर्तव्य असून, २०१६ पासून सुरू झालेल्या ‘निर्मल वारी’ उपक्रमामुळे वारीत स्वच्छता आणि आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्या आहेत.
संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांसोबतच इतर दिंड्यांसाठी ५ हजार फिरती शौचालये, १३ लाख चौरस फूट जर्मन हँगर आणि पाणी पुरवठ्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली. सुमारे ३० ते ३५ लाख वारकरी येऊनही पंढरपूर शहर स्वच्छ राहिल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. तसेच या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस दल, स्वच्छतादूत व वारकऱ्यांच्या सेवेसाठी झटणाऱ्या सर्व घटकांचे कौतुक केले.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी, वारीदरम्यान वारकऱ्यांसाठी मोबाईल चार्जिंग, हिरकणी कक्ष, रुग्णालय यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या निष्ठेमुळे यंदाची वारी पूर्णपणे साथीच्या रोगांपासून मुक्त राहिल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात स्वच्छ भारत मोहिमेत महाराष्ट्र प्रथम आल्याबद्दल संचालक शेखर रौंदळ, तज्ज्ञ डॉक्टर, सेवाभावी संस्था आणि स्वच्छतादूतांचा सत्कार करण्यात आला. तसेच ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२६’ बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्यास अनेक आमदार, वरिष्ठ सनदी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.