दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्येष्ठांची धाव: आपटेनगर ज्येष्ठ नागरिक संघाकडून रामणवाडीत रेनकोटचे वाटप
schedule07 Jul 26 person by visibility 152 categoryसामाजिक
कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील रामणवाडीसारख्या अतिदुर्गम भागात शिक्षणासाठी रोज ५-६ किलोमीटर पायपीट करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन, आपटेनगर ज्येष्ठ नागरिक संघ आणि उमाशंकर ज्येष्ठ नागरिक सेवा ट्रस्टच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. या दुर्गम भागातील ३० गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना रेनकोटचे वाटप करण्यात आले.
रविवारी, ५ जुलै रोजी मुसळधार पाऊस असतानाही कोल्हापुरातील ३० ज्येष्ठ नागरिक स्त्री-पुरुषांनी रामणवाडी येथे जाऊन विद्यार्थ्यांच्या गरजांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्यांच्याशी संवाद साधला. या उपक्रमासोबतच भैरीबांबर येथील वानरमारी कुटुंबाला भेट देऊन त्यांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. उमाशंकर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष विनायक कुलकर्णी यांनी या दुर्गम भागातील लोकांच्या अडचणी मांडत, शहरातील नागरिकांनी अशा गरजू बांधवांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
निसर्गाच्या सानिध्यात एक आगळावेगळा दिवस
या दौऱ्यात सहभागी झालेल्या ज्येष्ठांनी डिगज गावाला भेट दिली. येथील निसर्गरम्य वातावरण पाहून उपस्थितांना महाबळेश्वर-पाचगणीचा अनुभव आला. या गावातील बाबू कोकरे या ज्येष्ठ दांपत्याची जिद्द पाहून उपस्थित भारावून गेले. डिगजसारख्या दुर्गम भागात प्राथमिक शिक्षण घेऊन त्यांची नातवंडे आज मुंबईत इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहेत, हे पाहून विनायक कुलकर्णी यांनी मराठी माध्यमातील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
रामणवाडी येथे दत्तात्रय पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी ज्येष्ठ नागरिकांच्या भोजनाची उत्तम व्यवस्था केली होती. तसेच उमेश जोशी यांचा वाढदिवस यावेळी उत्साहात साजरा करण्यात आला. अतिवृष्टीमुळे राऊतवाडी धबधबा आणि गगनगिरी महाराजांच्या मठापर्यंतचा प्रवास काहीसा बाधित झाला असला, तरी या उपक्रमामुळे निसर्गाच्या सानिध्यात ज्येष्ठ नागरिकांचा दिवस आनंदात गेला.
या उपक्रमासाठी आपटेनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष डॉ. देवेंद्र रासकर, सचिव शरद दिवाण, नेहाली दिवाण, खजिनदार वृषाली गोटखिंडीकर, संचालक राजश्री सूर्यवंशी, सिंधुताई शिरोळे, दिनकर बोरगावकर यांच्यासह विश्वास शिरोळे, सुहास शेलार, मदन जोशी, अर्चना कुलकर्णी, रवींद्र निकम, शिल्पा पुराणिक, हर्षदा जोशी, अरुण कुलकर्णी, उमेश जोशी आणि अमर पारगावकर आदी उपस्थित होते. उपक्रमाच्या यशस्वीतेचे श्रेय विनायक कुलकर्णी यांनी सर्व सभासद आणि रेनकोटसाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या दात्यांना दिले आहे.