सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी आमदार यड्रावकर यांचा निर्णायक पाठपुरावा
schedule16 Aug 26 person by visibility 161 categoryमहानगरपालिका
सांगली : सांगली- मिरज-कुपवाड महानगरपालिकेत तब्बल ३० वर्षांपासून बदली मानधन, रोजंदारी व इतर स्वरूपात सेवा बजावणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याच्या प्रक्रियेला अखेर गती मिळाली आहे. गेल्या ११ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन बैठका घेऊन प्रभावी पाठपुरावा केला. कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी पुढील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याने कर्मचाऱ्यांच्या संघर्षाला निर्णायक दिशा मिळाली आहे.
महानगरपालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा प्रश्न गेल्या अकरा वर्षांपासून विविध आंदोलनांच्या माध्यमातून शासन दरबारी मांडला जात होता. अनेक पदाधिकाऱ्यांकडून वेळोवेळी आश्वासने मिळाली; मात्र प्रत्यक्ष निर्णय होत नसल्याने हा प्रश्न सातत्याने रेंगाळत राहिला. अनेक कर्मचारी दीर्घकाळ सेवा बजावत असूनही त्यांच्या सेवेला कायमस्वरूपी स्वरूप मिळत नसल्याने त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
दरम्यान, चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाच्या प्रतिनिधींनी गेल्या काही महिन्यांपासून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. कर्मचाऱ्यांचा दीर्घ सेवाकाळ आणि त्यांच्या प्रलंबित मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार यड्रावकर यांनी हा प्रश्न शासनाच्या सर्वोच्च पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला.
यड्रावकर यांच्या पुढाकारातून मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन वेळा बैठक घेण्यात आली. यावेळी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यासंदर्भातील महत्त्वाचे मुद्दे, त्यांचा प्रदीर्घ सेवाकाळ आणि प्रलंबित मागणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित यंत्रणेला कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया आणि पुढील कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे गेल्या ११ वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला आता सकारात्मक वळण मिळाले आहे.
दरम्यान, या पाठपुराव्याबद्दल चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाच्या प्रतिनिधींनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी कर्मचाऱ्यांनी यड्रावकर यांचे आभार मानत, आपल्या मागणीसाठी शासनस्तरावर प्रभावीपणे आवाज उठवल्याबद्दल समाधान व्यक्त केले. आता पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या सत्कार याप्रसंगी बाबासाहेब बागडी, श्रीराम सासणे, रेणुका कांबळे, बाळाबाई चंदनशिवे, बेबी माने, कमल कांबळे, मिरासो कांबळे, प्रवीण ढाले, पिंटू कांबळे, संजय पेठे, प्रकाश कांबळे, पप्पू गोंधळे, सुबराव मोहिते, सुभाष कांबळे यांच्यासह चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.