अभियंत्यांनी उद्योगाभिमुख कौशल्ये आत्मसात करावीत: डॉ. राजाराम गुरव
schedule11 Jun 26 person by visibility 84 categoryशैक्षणिक
विद्यापीठात 'पायपिंग अँड प्रोसेस प्लांट इंजिनिअरिंग'वरील कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर : अभियांत्रिकी शिक्षण केवळ पदवीपुरते मर्यादित राहून न घेता उद्योगांच्या गरजांशी सुसंगत कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे आवश्यक आहे. तांत्रिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष औद्योगिक प्रक्रियांचे आकलन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेत मोठी भर घालते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथील केमिकल इंजिनिअरिंग विभागामार्फत केंद्र सरकारच्या पीएम-उषा (PM-USHA) योजनेअंतर्गत आयोजित "पायपिंग अँड प्रोसेस प्लांट इंजिनिअरिंग: कॉन्सेप्ट टू कमिशनिंग" या तीन दिवसीय कौशल्य विकास कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. दि. ६ ते ८ जून या कालावधीत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रभारी संचालक डॉ. अजित कोळेकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयआयटी (मुंबई) चे सर्टिफाइड पायपिंग इंजिनिअर नितीन जी. नागेश्वर उपस्थित होते.
कार्यशाळेत एकूण बारा तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रोसेस डिझाइन, प्रेशर व्हेसल कॅल्क्युलेशन, मटेरियल स्पेसिफिकेशन्स, अत्याधुनिक सॉफ्टवेअर टूल्स, प्लांट कमिशनिंग, हॅझॉप सुरक्षा प्रणाली तसेच प्लांट मेंटेनन्स यांसारख्या महत्त्वपूर्ण औद्योगिक बाबींवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना विविध संकल्पनांची प्रात्यक्षिकांसह सखोल माहिती देण्यात आली.
कार्यशाळेचा समारोप सोमवारी (दि. ८) अंतिम परीक्षा व प्रकल्प सादरीकरणानंतर झाला. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केमिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख तथा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रवीणकुमार पाटील होते. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कार्यशाळेतून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग उद्योग क्षेत्रातील आव्हाने समर्थपणे पेलण्यासाठी करावा, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले. सहभागी विद्यार्थ्यांनीही कार्यशाळा उद्योगाभिमुख आणि करिअरच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना व्यक्त केली.