नोकरी शोधणारे नव्हे, रोजगारनिर्माते बना : सुरेश उमाप; डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये उद्योजकता जनजागृती कार्यक्रम
schedule11 Feb 26 person by visibility 129 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : आजच्या बदलत्या उद्योगविश्वात युवकांनी नोकरी शोधणारे न होता, रोजगारनिर्माते बनण्याची मानसिकता जोपासली पाहिजे. नवोपक्रम, जोखीम स्वीकारण्याची तयारी आणि स्वतःच्या कौशल्यांवर विश्वास ही यशस्वी स्टार्टअपची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन शिवमुद्रा इनोव्हेटिव्ह फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष तसेच एमसीईडीचे माजी प्रादेशिक अधिकारी सुरेश बी. उमाप यांनी केले. डी. वाय. पाटील आभियात्रिकी (स्वायत्त महाविद्यालय) येथे यांत्रिक विभागामार्फत आयोजित उद्योजकता जनजागृती कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली तसेच विद्युत मापन उपकरण डिजाइन संस्थान (आयडीईएमआय) मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आय- कनेक्ट (उद्योग–संस्था संवाद मालिका) अंतर्गत उद्योजकता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उद्योगक्षेत्रातील बदल, शासकीय योजना, एमएसएमईमार्फत उपलब्ध सुविधा आणि स्टार्टअप सुरू करताना आवश्यक असलेली मानसिक तयारी याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक करिअरच्या चौकटीबाहेर विचार करून नव्या संधींचा शोध घ्यावा, असे आवाहनही उमाप यांनी केले.
यांत्रिक अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एस. जे. रायकर म्हणाले, स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळविण्यावर समाधान न मानता उद्योजकतेकडे वळण्याची गरज आहे. उद्योग–शैक्षणिक संवाद विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. या माध्यमातून चांगले उद्योजक घडवण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.
संस्थेच्या इनोव्हेशन कौन्सिल (IIC) व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई) यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबविण्यात आला. प्रा. विराज पासरे, प्रा. उत्कर्ष पाटील व प्रा. योगेश चौगुले यांनी नियोजन व समन्वयन केले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील व पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.