दिल्लीतील विद्यार्थी लाठीमाराचा निषेध आणि अन्याय-अत्याचाराविरोधात उद्या महाराष्ट्र बंद
schedule22 Jul 26 person by visibility 214 categoryसामाजिक
◼️कोल्हापुरात वंचित बहुजन आघाडी, डावी आघाडी व समविचारी पक्षांकडून उत्स्फूर्त बंदची हाक
कोल्हापूर : दिल्ली येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमार व पोलिसांकडून झालेल्या कथित दडपशाहीचा निषेध करण्यासाठी तसेच देशातील वाढत्या अन्याय-अत्याचाराविरोधात उद्या, गुरुवार, २३ जुलै २०२६ रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक देण्यात आली आहे. या बंदला कोल्हापुरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडी आणि डावी आघाडी व समविचारी पक्षांच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे.
◼️वंचित बहुजन आघाडीतर्फे शहरात शांततापूर्ण रॅली व निषेध सभा
दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेला लाठीमार ही अत्यंत गंभीर बाब असून लोकशाही व्यवस्थेत विद्यार्थ्यांना आपले प्रश्न मांडण्याचा घटनात्मक अधिकार आहे, असे नमूद करत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात सकाळी ठीक ९:३० वाजता छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ, कोल्हापूर येथे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष जनार्दन कुबेर गायकवाड यांनी केले आहे.
◼️शांततापूर्ण रॅलीचा मार्ग:
* शाहू समाधी स्थळ → दसरा चौक → बिंदू चौक → दाभोळकर कॉर्नर
* एस. टी. स्टँड → राजारामपुरी → बागल चौक → उमा टॉकीज चौक
* रिलायन्स मॉल → दसरा चौक
रॅलीनंतर दसरा चौक येथे निषेध सभा आयोजित करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांनावरील कारवाईचा निषेध करणारे निवेदन महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडे ई-मेलद्वारे पाठवण्यात येणार आहे. कोल्हापूरकरांनी आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून, कोणताही अनुचित प्रकार न घडू देता, शांततापूर्ण, लोकशाही व संविधानिक मार्गाने महाराष्ट्र बंद यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
> "विद्यार्थ्यांवर लाठीमार नव्हे, न्याय हवा!"
> "लोकशाहीत संवाद हवा, दडपशाही नको!"
> "आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एकत्र या– महाराष्ट्र बंद यशस्वी करा!"
◼️डावी आघाडी व समविचारी पक्षांकडून विविध मुद्यांवर तीव्र आक्षेप
दरम्यान, डावी आघाडी व समविचारी पक्षांच्या वतीने देखील २३ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. केंद्र व राज्याच्या धोरणांविरुद्ध आक्रमक भूमिका घेत, नीट पेपर लीक, शाळा-अंगणवाडीची आबादळ, महाविद्यालयात शिक्षक नसणे, स्पर्धा परीक्षा वारंवार रद्द होणे व पेपर फुटणे, कंत्राटीकरण आणि कामगार कायदे मोडित काढल्यामुळे विद्यार्थ्यांचे व युवकांचे भविष्य अंधकारमय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या बंदमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिक, विद्यार्थी, युवक, शेतकरी, कामगार, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, सराफ व्यावसायिक, चेंबर्स ऑफ कॉमर्स, रिक्षा-टॅक्सी संघटना, ट्रान्सपोर्ट संघटना, विविध सामाजिक संस्था आणि संविधानवादी विचारांचे सर्व घटक यांनी उत्स्फूर्त व शांततापूर्ण सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रमुख उपस्थिती व स्वाक्षरीकर्ते: जनार्दन कुबेर गायकवाड (जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी), रघुनाथ कांबळे, बाबराव कदम, अतुल दिघे, सतीशचंद्र कांबळे (भाकप), सुवर्णा तळेकर (जि. अंगणवाडी संघटना), संजय गावडे, दिलीप लोखंडे (बँक एप्लॉईज युनियन), सदाशिव निकम आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते