कोल्हापूरच्या रेल्वे विकासासाठी खासदार धनंजय महाडिक यांचा पाठपुरावा, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना दिले निवेदन
schedule29 Jul 26 person by visibility 167 categoryराज्य
कोल्हापूर : कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन, कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण कामाला गती मिळावी, अशी विनंती केली. शिवाय कोल्हापूर सह पश्चिम महाराष्ट्राच्या गतिमान दळणवळणासाठी प्रलंबित रेल्वे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली.
नवीन रेल्वेगाड्या, वंदे भारत सेवा, रेल्वे स्थानकांचा विकास आणि मालवाहतुकीशी संबंधित अनेक मुद्दे खासदार महाडिक यांनी उपस्थित केले.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत, खासदार धनंजय महाडिक यांनी सर्वप्रथम कोल्हापूर–मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला विषय मांडला. योजनेला मंजुरी मिळाली आहे मात्र प्रत्यक्ष काम तातडीने सुरू व्हावे आणि वेगाने पूर्ण व्हावे, कशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे केली.
या प्रकल्पासाठी प्रत्यक्षात जमीन संपादनासह आवश्यक प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे हा प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याची त्यांनी आग्रही मागणी केली. कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाल्याशिवाय नवीन लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुरू करणे शक्य होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी खासदार महाडिक यांनी कोल्हापूरसाठी काही नवीन रेल्वेगाड्यांच्याही मागण्या मांडल्या. त्यामध्ये कोल्हापूर–मिरज–पंढरपूर, कोल्हापूर–पंढरपूर - तिरुपती, तसेच गुजरात आणि राजस्थानकडे जाणाऱ्या नवीन लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुरू करण्याची मागणी केली.
तसेच कोल्हापूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेस सध्या आठवड्यातून तीन दिवस धावत असून, ती सातही दिवस सुरू करावी, कोल्हापूर–मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी, सह्याद्री एक्सप्रेस पूर्वीप्रमाणे मुंबईपर्यंत चालवावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
तसेच कोल्हापूर रेल्वे स्थानकांवरील प्रलंबित विकासकामे, मालवाहतूक सुविधांशी संबंधित प्रश्न आणि इतर रखडलेले रेल्वे प्रकल्प लवकर पूर्ण करून कोल्हापूरच्या रेल्वे विकासाला गती द्यावी, अशी आग्रही भूमिका खासदार धनंजय महाडिक यांनी रेल्वेमंत्र्यांसमोर मांडली. त्यातून कोल्हापूरच्या रेल्वे विकासाला गती मिळेल, अशी आशा आहे.