‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन
schedule07 Aug 26 person by visibility 128 categoryराज्य
कोल्हापूर : केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्यात दि. 9 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने दिलेल्या सूचनांनुसार राज्य शासनाने विविध विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
‘विभाजन विभीषिका स्मृतीदिन’ निमित्त राज्यस्तरीय कार्यक्रम, नाट्य, प्रदर्शन, शॉर्ट फिल्म तसेच शाळा व महाविद्यालयीन स्तरावर परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच दि. 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2026 या कालावधीत MyGov पोर्टलवरील प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये ध्वजारोहण, देशभक्तीपर गीतांचे कार्यक्रम, प्रदर्शन, तिरंगा ई-बाईक रॅली, तिरंगा रॅली, ‘सेल्फी विथ तिरंगा’, रांगोळी आदी उपक्रमांचा समावेश आहे.
तसेच ‘वंदे मातरम्’ गीतास 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तिरंगा सेल्फी तसेच वंदे मातरम् गीत असलेले व्हिडिओ HarGharTiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालये तसेच संबंधित शासकीय कार्यालये, महानगरपालिका, जिल्हा परिषद, महामंडळे, शाळा व महाविद्यालयांमध्ये तिरंगा रंगाची रोषणाई, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिकांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.