मुंबई : मुंबई-पुणे महामार्गावर डोंबिवलीतून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या खासगी बस- ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर ४२ जण जखमी झाले. सोमवारी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास हा अपघात झाला.
हौसाबाई पाटील रा. घेसर, गुरुनाथ महाराज पाटील रा. नारिवली, रामदास नारायण मुकादम रा. नावाळी, अशी मृत वारकऱ्यांची नावे आहेत. जखमींवर पनवेल येथील एमजीएम आणि उपजि रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अपघातानंतर मुंबई एक्स्प्रेस हायवेची मुंबई-लोणावळा लेन तीन तास बंद होती. क्रेनच्या मदतीने बस बाहेर काढण्यात आल्यानंतर पुन्हा वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे.
डोंबिवली वरून आषाढी एकादशीनिमित्त ५ ट्रॅव्हल्स रात्री निघाल्या होत्या. रात्री पावणे एकच्या दरम्यान महामार्गावर ट्रॅव्हल्स पोहचली असता बस आणि ट्रक्टरची धडक झाली. बस धडकल्यानंतर चालकाचा ताबा सुटल्याने बस महामार्गावरून ३० ते ४० फुट खोलखड्यात पडली. बसमधील ५४ भाविकांपैकी ५ भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर ४२ भाविक जखमी झाले.