वीस पंचवीस वर्षांपूर्वीची घटना आहे,एके दिवशी माझे स्नेही डॉ.श्रीकांत शिंदे यांचें वडील मोहनराव शिंदे यांच्या समवेत मला कोल्हापूरातील पाच बंगला परिसरातील 'जदूबन' या वास्तूमध्ये विठ्ठल कोतेकर यांच्या 'वैभव सेल्फ डेव्हलपमेंट बुक्स' या अभिनव पुस्तक विक्री केंद्राला भेट देण्याचा योग आला. या पहिल्याच भेटीत मला त्यांच्या व्यवसायातील वेगळेपण प्रकर्षाने जाणवले. सीमा भागातून कोल्हापूरात येऊन अत्यंत तुटपुंज्या भांडवलावर त्यांनी टाईपिंगचा व्यवसाय सुरू केला होता. ग्राहकांशी मधूर बोलणे, कामावर निष्ठा, सेवेतील तत्परता आणि चिकाटी या गुणांमुळे अल्पावधीतच त्यांनी आपल्या व्यवसायात जम बसविला.
टायपिंगचा व्यवसाय सांभाळत असतांनाच त्यांनी प्रतिकुल परीस्थितीशी आपणास जो सामना करावा लागला,जो त्रास सहन करावा लागला,तसा इतरांना होऊ नये म्हणून अनेक होतकरू तरुणांना विनामूल्य मार्गदर्शन व सहकार्य केले. लहान भाऊ भिमराव हे सुद्धा या व्यवसायात काम करीत करीत वकील झाले, आज ते कोल्हापूरात दीवाणी कोर्टात नामांकित आहेत.
विठ्ठल कोतेकर यांनी चालविलेले ' वैभव सेल्फ डेव्हलपमेंट बुक्स' हे पुस्तक विक्री केंद्र आगळे वेगळे आहे. एखाद्या पुस्तकांच्या प्रदर्शनात सर्व पुस्तके जशी वाचकांच्या नजरेत यावीत याप्रमाणे मांडलेली असतात आणि वाचकांना ती सहजपणे पाहता येतात,चाळता येतात, निवडून घेता येतात त्याप्रमाणे विठ्ठल कोतेकर यांनी आपल्या दुकानाची मांडणी केलेली आहे. सहज रस्त्यावरून चालणाऱ्या वाटसरूला श्री.कोतेकरांची पुस्तके खुणावतात, जणुकाही पुस्तकेच वाचकांना आकर्षित करतात.
केवळ 'व्यक्तीमत्व विकास' या विषयावरील पुस्तकेच याठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत, त्या अनुषंगाने निरनिराळी कौशल्ये, यशस्वी उद्योजक,व उद्योगपती यांची चरित्रे, तसेच माईंड पाॅवर संदर्भातील सर्व पुस्तके इथे भेटतात. कथा, कादंबरी, नाटके यासारखी सवंग मनोरंजनात्मक पुस्तके इथे विक्रीला ठेवण्याचे कटाक्षाने टाळले आहे. इतरत्र पुस्तकांच्या दुकानात काऊंटरवरूनच पुस्तके पहावी लागतात, हवे असलेल्या पुस्तकांचे नाव सांगून आहे की नाही हे विचारावे लागते. इथे वाचक आत आला की,तो आपसूकच या पुस्तकांशी संवाद साधतो. पुस्तके जणू वाचकांशी बोलतातच असा चमत्कार या ठिकाणी पहायला मिळतो, ही किमया कल्पकतेने साधली ती विठ्ठल कोतेकर यांनी. यामागे त्यांची केवळ व्यावसायिक वृत्ती नसून समाजातील तरुण पिढीला विधायक दिशा देण्याची मनापासूनची तळमळ दिसून येते.
या यशस्वी वाटचालीत त्यांनी स्वतः मांईंड पाॅवर ट्रेनर म्हणून कौशल्य प्राप्त केले.आणि मराठी तरुणांना यशाचे शिखर गाठण्यासाठी स्वतः आपल्या मन: शक्तीचा वापर आपल्या करीअरसाठी कसा करता येतों, याचे शास्त्रशुद्ध शिक्षण देण्याचे असिधाराव्रतच घेतले. एका वेगळ्या पण शास्त्रीय मानसोपचार या विषयावर त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने दिली.त्यातूच आज त्यांचा माईंड पाॅवर ट्रेनिंग प्रोग्राम आकाराला आला आहे.त्याला समाजातील अनेक थरातून प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
व्यक्तीमत्व विकास या संबंधीची विठ्ठल कोतेकर यांची तळमळ प्रामाणिक व अंत:प्रेरक अशी आहे.या संदर्भात ते म्हणतात," मी शुन्यातून प्रगती केली आहे,मला अनंत संकटांना तोंड द्यावे लागले, खूप खाच खळगे अनुभवले आहेत,या बऱ्यावाईट अनुभवातून मिळालेले ज्ञान मला इतरांना द्यायचे आहे, धडपड्या तरुणांना सहाय्य करायचे आहे, त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास करायचा आहे.त्यांना येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी माईंड ट्रेनिंग सारख्या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे."
पोलीस डिपार्टमेंटसह शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी त्यांची मोठ्या प्रमाणात व्याख्याने व प्रात्यक्षिके होत आहेत. हा त्यांचा विधायक उपक्रम निश्चितच स्वागतार्ह आहे.
✍️ डॉ.सुनीलकुमार सरनाईक, कोल्हापूर
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून कोल्हापूर येथील ज्येष्ठ पत्रकार आहेत.)