लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्र सरकारविरोधात कोल्हापुरात काँग्रेसचा कॅन्डल मार्च
schedule25 Jul 26 person by visibility 177 categoryराजकीय
कोल्हापूर : देशभरात सातत्याने होणाऱ्या परीक्षांच्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थी व पालकांचे भविष्य टांगणीला लागले आहे. या गंभीर प्रश्नावर केंद्र सरकारच्या दुर्लक्षाविरोधात आणि पीडित विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार आज शनिवारी (२५ जुलै) कोल्हापुरात काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य धरणे आंदोलन व कँडल मार्च काढण्यात आला.
कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरातील राजाराम गार्डन, जनता बाझार चौक येथे सायंकाळी हे आंदोलन पार पडले. त्यानंतर राजारामपुरीतून सायबर कॉलेजपर्यंत कँडल मार्च काढण्यात आला.
🟣 आमदार सतेज पाटील यांची आक्रमक भूमिका:
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले की, जरी या प्रकरणी संबंधित मंत्र्याचा राजीनामा झाला असला, तरी देशातील विद्यार्थ्यांवर झालेले लाठीचार्ज आणि देशभरात विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले पाहिजेत. फक्त एका पेपरफुटीचा विषय नाही, तर काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत देशात अनेक ठिकाणी परीक्षांचे पेपर फुटले असून तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहून संविधान व लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेस पक्षाचा हा लढा असाच सुरू राहील, असा इशारा त्यांनी दिला.
या आंदोलनात काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, संजय कांबळे, तौफिक मुल्लाण्णी, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, इंद्रजीत बोंद्रे, शहराध्यक्ष प्रविण केसरकर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, तालुकाध्यक्ष, जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते, महिला, कार्यकर्ते, युवक काँग्रेस, एनएसयूआयचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.