मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करून बोगस मतदानाचे मनसुबे उधळून लावा : आमदार राजेश क्षीरसागर
schedule05 May 26 person by visibility 128 categoryराजकीय
कोल्हापूर : भारतीय निवडणूक आयोगामार्फत सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेद्वारे शहरातील बोगस मतदान कायमचे हद्दपार करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. शिवसैनिकांनी प्रत्यक्ष ऑन फिल्ड काम करून मतदार याद्यांमधील त्रुटी दूर कराव्यात आणि विरोधकांचे बोगस मतदानाचे मनसुबे उधळून लावावेत, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.
कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मतदार यादीतील डेटाचा सखोल अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या.
कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदारांचे मॅपिंग होत नसल्याने तांत्रिक तपासणी आवश्यक आहे. एकाच मतदाराची नावे वेगवेगळ्या केंद्रांवर असल्यास किंवा स्थलांतरित व्यक्तींची नावे यादीत असल्यास ती वगळण्यासाठी बीएलओंकडे पाठपुरावा करावा. प्रत्येक मतदाराचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड मतदार ओळखपत्राशी लिंक असल्याची खात्री करावी. ज्या भागात संशयास्पद नोंदणी जास्त आहे, तिथे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे.
यावेळी क्षीरसागर यांनी विरोधकांवर तोफ डागताना म्हटले की, जनतेचा आधार उरला नसल्यानेच विरोधक बोगस मतदानाचा आधार घेत गल्लीबोळात फिरत आहेत. या बैठकीस शारंगधर देशमुख, ऋतुराज क्षीरसागर, शिवाजी जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.