शेतकऱ्यांनी शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतील उत्पन्न वाढवावी
schedule31 May 25 person by visibility 288 categoryराज्य

कोल्हापूर : कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय,भारत सरकार व भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून विकसित कृषी संकल्प अभियान (खरीपपूर्व कृषी रथयात्रा) यांच्या संयुक्त विद्यमाने २९ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत संपूर्ण देशभरात विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत खरीप पूर्व राष्ट्रीय प्रचार मोहीम राबवली जाणार आहे. कृषी विज्ञान केंद्र, कणेरी मार्फत प्रचार रथाव्दारे थेट शेतकऱ्यांना खरीप हंगामावरील तांत्रिक माहिती दिली जाणार आहे. हे अभियान शेतीची उत्पादन क्षमता व उत्पन्नवाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधू-भगिनींनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र, कणेरी, कोल्हापूर यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
या अभियानाचा उद्देश मागणीवर आधारित कृषी संशोधनाला चालना देणे, शेतीमधील नवोन्मेष, संशोधन व तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे,आणि शाश्वत व सर्वसमावेशक कृषी विकासासाठी शेतकरी केंद्रित उपक्रमांना प्रोत्साहन देणे हा आहे. जिल्ह्यातील या अभियानाची अंमलबजावणी कृषी विज्ञान केंद्र, कणेरी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर यांच्या नेतृत्वाखाली केली जात आहे. यामध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभाग, (आत्मा), महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, तसेच आयसीएआर अंतर्गत विविध संस्थांचे बहुमूल्य सहकार्य लाभत आहे.
३१ मे, २०२५ रोजी रयत गोडवून, पाडली खुर्द,करवीर तालुका येथे खरीप हंगामा संदर्भातील सखोल मार्गदर्शन, हवामान आधारित पीक नियोजन, बियाण्यांची निवड, खत व्यवस्थापन, पीक संरक्षण उपाययोजना, तसेच बाजारपेठेचा आढावा आदी बाबींवर तज्ञांनी मार्गदर्शन केले.
या अभियानांतर्गत शेतकरी संवाद रथ हे माध्यम वापरण्यात आले. हा प्रचार व माहितीपर रथ ९० गावांमध्ये भ्रमण करणार असून, शेतकऱ्यांपर्यंत दृकश्राव्य माध्यमातून खरीप हंगामावरील आधुनिक तांत्रिक माहिती पोहोचविण्यात येणार आहे. या रथात विविध कृषी माहितीपत्रके, सल्ला पत्रके, तांत्रिक सादरीकरणे, ऑडिओ-व्हिज्युअल सत्रे व तज्ञांचे संदेश प्रसारित करण्यात आले. या कार्यक्रमात भाकृअनुप-पुष्प कृषि अनुसंधान निदेशालय, पुणेचे डॉ. प्रशांत व डॉ. राहुल यांनी शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. रवींद्र सिंह, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, श्री सिध्दगिरी कृषि विज्ञान केंद्र, कणेरी यांनी कार्यक्रमाचा प्रास्ताविक केले आणि शेतकऱ्यानं जातीत जास्त या अभियानामध्ये सहभागी होऊन लाभ घ्यावे असे आवाहन केले. डॉ. विद्या सागर गेडम, ऊस व गुळ संशोधन केंद्र, कोल्हापूर यांनी ऊस पिकावर विविध विषयावर सखोल मार्गदर्शन केले. अरुण भिंगारदिवे, उपविभागीय कृषि अधिकारी, करवीर यांनी शेतकरी आयडी, एकात्मिक माती व्यवस्थापनामध्ये माती आरोग्य पत्रिका, नवीन शासकीय योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमात शेतकरी कंपनीचे सदस्य, नवाचार करून चांगले शेती व शेती निगडित व्यवसाय करणारे शेतकरी व महिला उद्योजक उपस्थित होते. सौ. सैलजा राऊत, मसाले उद्योजक, तुषार मसाले यांनी यांचे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी केव्हिकेचे सर्व शास्त्रज्ञ, कृषि विभाचे अधिकारी व कर्मचारी, आत्मा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.