SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शक्तीपीठ महामार्ग विरोधी लढा : बांधा ते वर्धा मे अखेरीस संघर्ष यात्रा काढणार : आमदार सतेज पाटीलकोल्हापूर महानगरपालिकेतर्फे एअर रायफल ट्रेनिंगचे 10 मे पासून प्रशिक्षण सुरुडी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात बौद्धिक संपत्ती अधिकार कक्षाची स्थापना; मायक्रेव्ह कन्सल्टंसी समवेत सामंजस्य करारसकारात्मक सुरुवात, सातत्य, संयम ठेवा स्वप्न साध्य होईल : ईशा झंवर; केआयटी प्रचंड उत्साहामध्ये ई-समीट संपन्नकोल्हापूर महापालिकेसमोर खेळणी रचून 'आप'चे आंदोलन; उद्यानातील मोडकी खेळणी बदलण्याची मागणीशक्तीपीठ महामार्गा विरोधातील शेतकऱ्याची आज ऑनलाईन राज्यव्यापी बैठकतेज रोलर स्केटिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यशभारताच्या सैन्यदलाला सलाम ! जयहिंद !!निकालानंतर 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची मोफत सेवाडीकेटीईच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्नीकमध्ये एआयएमएल व मेकॅट्रॉनिक्स पदविका अभ्यासक्रमांना एआयसीटीई, दिल्लीकडून मान्यता; दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांस सुवर्णसंधी

जाहिरात

 

देशाच्या विकासात आर्थिक संस्थांचा मोलाचा वाटा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेचा रौप्य महोत्सवी सोहळा

schedule16 Feb 25 person by visibility 384 categoryराज्य

चंद्रपूर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आहे. त्यांनी  भारतातील प्रत्येक नागरिकाला बँकिंग क्षेत्रासोबत जोडले आहे. आज भारतातील प्रत्येक नागरिकाचे बँक खाते आहे. त्यामुळे डीजीटल ओळख निर्माण झाली आहे. त्याचा थेट फायदा नागरिकांना मिळत आहे. देशाच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या विकासात आर्थिक संस्थांचा मोलाचा वाटा असून जेथे आर्थिक संस्था उभ्या राहतात, तेथे विकास भरभरून होतो, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त प्रियदर्शनी इंदिरा सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री  फडणवीस बोलत होते.

सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेने 25 वर्ष यशस्वीपणे पूर्ण केले, असे सांगून मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले, सहकार क्षेत्रात विदर्भातील एक अग्रगण्य बँक म्हणून सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेची ओळख आहे. महिलांना अर्थकारण समजते. बचत करणे हा महिलांचा मूळ गुणधर्म आहे. सहकारी बँकेवर नागरिकांचा विश्वास असतो. या बँकेबद्दल सामान्य माणसाला आपुलकी असते. बँकेने सुद्धा दिलेले कर्ज शिस्तीमध्ये परत घेतले पाहिजे. आज 300  कोटींची उलाढाल असलेल्या सन्मित्र बँकेचा एनपीए 0.5 टक्क्यांच्या खाली आहे, ही अतिशय उत्कृष्ट कामगिरी आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने चांगली प्रगती केली आहे. व्यावसायिक बँकांसमोर सहकारी बँकेने आव्हान उभे केले आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात सहकारी बँका टिकतील का, असा प्रश्न उपस्थित होत असताना सन्मित्र सारख्या बँकांनी हे आव्हान चांगल्या पद्धतीने स्वीकारून यशस्वीपणे वाटचाल केली आहे. आज या बँकेने कोर बँकिंग, डिजिटल बँकिंग पद्धती स्वीकारली आहे. सन्मित्र बँकेने ग्राहकांच्या सुरक्षेचे विषय हाती घेतले आहेत. बँकांकडून नागरिकांना कर्ज दिली जातात. त्यामुळे नागरिक स्वतःच्या पायावर उभे राहून व्यवसाय करीत आहे. सन्मित्र बँकेने सुद्धा नागरिकांना कर्ज उपलब्ध करून दिले आहेत. त्यातून त्यांनी रोजगार उभा केला. त्यामुळे अर्थव्यवस्थेची चक्र चालण्यास मदत झाली. या बँकेने पुढील वाटचाल अधिक जोमाने करावी.

संयुक्त राष्ट्र संघटनेने 2025 हे वर्ष सहकार वर्ष म्हणून जाहीर केले आहे. याच वर्षी सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेचा रौप्य महोत्सव होत आहे, ही आनंदाची बाब आहे. भविष्यात आणखी दमदार पाऊल टाकून 500 कोटी, 750 कोटी आणि 1000 कोटीचा टप्पा बँकेने पार करावा. तसेच इतर सहकारी बँकांसाठी सन्मित्र बँक एक रोल मॉडेल म्हणून उभी राहावी, अशी अपेक्षा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले, सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेचा विस्तार सहा-सात जिल्ह्यात झाला असून महिलांना आर्थिक सक्षम करणे, हेच या बँकेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून बँकेला नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रास्ताविकात संचालिका शोभाताई फडणवीस म्हणाल्या, सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेच्या रौप्य महोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस उपस्थित राहिले, याचा मनापासून आनंद आहे. बँकेची वाटचाल यशस्वीपणे होत असून पुढे जाण्याचा ध्यास आम्ही घेतला आहे. आज सन्मित्र बँकेच्या सर्व शाखांमध्ये एटीएम, डीजीटल बँकींग आदी सोयीसुविधा आहेत. विशेष म्हणजे आमच्या बँकेचा एनपीए कमी आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी बँकेच्या अध्यक्षा डॉ. रजनी हजारे यांनीसुध्दा मनोगत व्यक्त केले.

तत्पुर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘लक्षलक्षिता’ या स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला कर्मवीर मा.सां. कन्नमवार यांचे नाव दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन कीर्ति चांदे यांनी तर आभार माधवी तांबेकर यांनी मानले.

यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, कीर्तिकुमार भांगडीया, करण देवतळे, देवराव भोंगळे, माजी मंत्री व बँकेच्या संचालिका शोभाताई फडणवीस, अध्यक्षा डॉ. रजनी हजारे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes