गोकुळची निवडणूक बिनविरोध होणे अशक्यच! मंत्री हसन मुश्रीफ यांचा विरोधकांवर हल्लाबोल; दूध संघाच्या राजकारणावर स्पष्टोक्ती
schedule17 Sep 26 person by visibility 186 categoryउद्योग
कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज पत्रकार परिषदेत विविध राजकीय व सामाजिक घडामोडींवर रोखठोक भाष्य केले. यावेळी गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले. गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होण्याच्या शक्यतेपासून ते महायुतीमधील राजकीय समीकरणे आणि दुष्काळी परिस्थितीपर्यंत विविध मुद्द्यांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
▪️गोकुळची निवडणूक बिनविरोध होणार नाही!
गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होण्याबाबत विचारले असता मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले की, सध्याचे चित्र पाहता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता नाही. मोठ्या प्रमाणावर दाखल झालेले उमेदवारी अर्ज आणि दावे-प्रतिदावे यामुळे निवडणूक अटळ असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, अपात्र दूध संस्थांच्या मुद्द्यावर बोलताना, पात्र ठरलेल्या संस्थांमध्ये ७५ ते ८० टक्के संस्था या राष्ट्रवादी, शिवसेना (शिंदे गट) आणि जनसुराज्य पक्षाच्या असून केवळ १५ ते २० टक्के संस्था काँग्रेसच्या आहेत, त्यामुळे त्यांच्या पात्रतेसाठी आम्हालाच प्रयत्न करावे लागल्याचे सांगत त्यांनी श्रेयवादाला उत्तर दिले. महायुती म्हणूनच ही निवडणूक लढवली जाईल आणि जिंकूही, असे त्यांनी विश्वासाने सांगितले.
▪️महायुती आणि अन्य राजकीय घडामोडींवर रोखठोक उत्तरे
* सतेज पाटील यांच्या टीकेवर: आमदार सतेज पाटील यांनी विचारलेल्या 'सत्तेत असूनही न्यायालयात का जावे लागले?' या प्रश्नावर, हे कोडं अजून आम्हालाही उलगडलेले नाही आणि हा सगळा प्रकार अनाकलनीय असल्याचे त्यांनी मान्य केले.
* खासदार धनंजय महाडिक यांचे वक्तव्य: भाजपला गृहीत धरू नका यावर प्रतिक्रिया देताना, कोण काय बोलतोय यापेक्षा महायुती होणार आणि टिकणार असल्याचे मुश्रीफ म्हणाले. बार्गेनिंग पॉवर आणि सदस्यसंख्या वाढवण्यासाठी सगळेच आपापल्या परीने प्रयत्न करत असून यामुळे महायुतीत मिठाचा पडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
* मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन: मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक स्वागत करून, शासनाने १३ पैकी १२ मागण्या मान्य केल्या असून उर्वरित एका मागणीवर कायदेशीर अडचणी समजून सांगण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
* पुणे पदवीधर मतदारसंघ: प्रताप उर्फ भैया माने यांच्या उमेदवारीवर बोलताना, गेल्या काही निवडणुकांमध्ये या मतदारसंघात राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला असून यंदाही ही जागा राष्ट्रवादीच्या पदरात पाडून घेणे महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी भैया माने यांच्या कामाचे कौतुक केले.
* दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय निष्पक्षपणे करेल, असे त्यांनी नमूद केले. तसेच राष्ट्रवादीच्या आगामी नाशिक येथील बैठकीत पक्षाच्या वाटचालीसंदर्भातील मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पावसाच्या खंडावर आणि शेती पाणीप्रश्नावर तातडीचे उपाय
कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरात पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. याबाबत मंत्री मुश्रीफ यांनी गांभीर्य दाखवत कालच जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेऊन दूधगंगा धरणातून दोन्ही कालव्यातून तातडीने पाणी सोडण्याची विनंती केली होती. त्यानुसार पाणी सोडण्यात आले असून, ऑगस्ट २०२७ पर्यंतचे पिण्याचे पाणी राखून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाचवण्यासाठी काटेकोर नियोजन केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.