केआयटीचा प्लेसमेंटमध्ये नवा इतिहास ! १५७ कंपन्यांकडून ६५२ विद्यार्थ्यांची विक्रमी निवड; सर्वोच्च पॅकेज ₹२७.५० लाख
schedule10 Jul 26 person by visibility 142 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम आणि कौशल्याधारित प्रशिक्षणाच्या बळावर के.आय.टी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (प्रदत्त स्वायत्त), कोल्हापूरने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्लेसमेंट क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. यंदा १५७ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सहभाग घेत ६५२ हून अधिक विद्यार्थ्यांची विक्रमी निवड केली.
यंदाच्या प्लेसमेंटमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा पॉवर, बेंटली सिस्टिम्स, बीटी ब्लॉक्स, ॲटलास कॉपको आणि किर्लोस्कर ब्रदर्स यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी केआयटीच्या विद्यार्थ्यांवर विश्वास दाखवत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना संधी दिली.संस्थेच्या विद्यार्थ्यांना मिळालेले सरासरी वार्षिक पॅकेज ₹ ६.५० लाख, तर सर्वोच्च वार्षिक पॅकेज तब्बल ₹२७.५० लाख इतके आहे.
यंदाच्या प्लेसमेंटची आणखी एक ठळक बाब म्हणजे मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, पर्यावरण आणि बायोटेक्नॉलॉजी या कोअर शाखांतील विद्यार्थ्यांनीही आयटी क्षेत्राच्या तोडीस तोड आकर्षक पॅकेजेस मिळवत आपल्या गुणवत्तेची प्रभावी छाप पाडली. त्यामुळे केआयटीच्या उद्योगाभिमुख शिक्षणपद्धतीची आणि सर्व शाखांतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण तयारीची पुन्हा एकदा प्रचिती आली.
केआयटीमध्ये केवळ नोकरी मिळवून देण्यावर भर न देता दुसऱ्या वर्षापासूनच करिअर नियोजन, कौशल्यविकास, मॉक इंटरव्ह्यू, कॉर्पोरेट ग्रूमिंग आणि उद्योगसुसंगत प्रशिक्षण दिले जाते. तसेच ISRO-संबंधित प्रकल्प, संशोधन उपक्रम आणि इंटर्नशिप यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची तांत्रिक क्षमता, संशोधनवृत्ती आणि व्यावसायिक कौशल्य अधिक सक्षम केले जाते. याच सर्वसमावेशक प्रशिक्षणामुळे केआयटीचे विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या पसंतीस उतरून उद्योगविश्वात यशस्वीपणे आपले स्थान निर्माण करत आहेत.
या अभूतपूर्व यशाबद्दल समाधान व्यक्त करताना संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली म्हणाले, "दर्जेदार पायाभूत सुविधा, अत्याधुनिक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापक आणि प्रभावी इंडस्ट्री कनेक्ट यामुळे केआयटीचा विद्यार्थी आत्मविश्वासाने उद्योगविश्वात प्रवेश करतो. प्लेसमेंटमधील हा विक्रम संस्थेच्या गुणवत्तेच्या बांधिलकीचा आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा ठोस पुरावा आहे."
संस्थेचे संचालक डॉ. मोहन बी. वनरोट्टी म्हणाले, "उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, सातत्यपूर्ण कौशल्यविकास आणि विद्यार्थीकेंद्रित प्रशिक्षणामुळेच आमचे विद्यार्थी देशातील आघाडीच्या कंपन्यांची पहिली पसंती ठरत आहेत. भविष्यातही ही यशाची परंपरा अधिक भक्कम करण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे."
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले,अन्य सर्व विश्वस्त, रजिस्ट्रार डॉ. दत्तात्रय साठे, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.