उद्योगविश्वाच्या बदलत्या गरजा ओळखा; टीसीएस उपाध्यक्षांचा टीकेआयईटी विद्यार्थ्यांना मंत्र
schedule19 Aug 26 person by visibility 75 categoryशैक्षणिक
वारणानगर : उद्योगविश्वात झपाट्याने होत असलेले बदल लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी सातत्याने नवे ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करावीत, नावीन्यपूर्ण विचार करावा आणि बदलत्या गरजांशी जुळवून घ्यावे, असा सल्ला टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष तथा मुख्य तंत्रज्ञान अधिकाऱ्यांचे व्यवसाय नवकल्पना व उद्योग सल्लागार शंकरनारायणन विश्वनाथन यांनी दिला.
तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, वारणानगर येथे कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टम विभागाच्या वतीने विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. ‘आजच्या जगातील व्यावसायिक नवकल्पना आणि उद्योगविश्वाची दृष्टी’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ. विनय कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी, एन. एच. पाटील, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
श्री. विश्वनाथन यांनी आधुनिक तंत्रज्ञानातील बदल, व्यवसायातील नवकल्पना, उद्योग क्षेत्राच्या बदलत्या अपेक्षा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भविष्यातील संधी याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसे नसून समस्या सोडविण्याची क्षमता, नावीन्यपूर्ण विचार, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि सातत्याने शिकण्याची वृत्ती या बाबी व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी नोकरीच्या संधी, प्रशिक्षण, उद्योगाभिमुख प्रकल्प तसेच टीसीएसमधील रोजगाराच्या विविध संधींबाबत प्रश्न विचारले. उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा समजून घेण्याबरोबरच भविष्यातील व्यावसायिक आव्हानांसाठी स्वतःची तयारी करण्याची दिशा या संवादातून विद्यार्थ्यांना मिळाली.
कार्यक्रमास प्राचार्य डॉ. के. आय. पाटील आणि अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे यांचे मार्गदर्शन लाभले. विभागप्रमुख डॉ. एस. एस. बोरचाटे यांनी कार्यक्रमाचे समन्वयन केले. प्रा. एस. ए. मुजावर, प्रा. एन. पी. गायकवाड, प्रा. एस. एस. जमादार, प्रा. पी. एम. पाडोळे आणि प्रा. ए. एल. सरनोबत यांनी सहकार्य केले.
टीसीएसच्या पुणे विभागातील शैक्षणिक भागीदारी गटाचे प्रादेशिक प्रमुख श्री. आशिष शहा यांनीही कार्यक्रमासाठी सहकार्य केले.
या संवादामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान क्षेत्रातील बदल, उद्योगविश्वाच्या अपेक्षा आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी यांची अधिक स्पष्ट जाणीव झाली. टीकेआयईटी आणि टीसीएस यांच्यातील उद्योग–शैक्षणिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.