'नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल'चे नियम धाब्यावर बसवून कोल्हापुरात वृक्षहत्या; सुराज्य अभियानाची फौजदारी कारवाईची मागणी
schedule22 Apr 26 person by visibility 104 categoryसामाजिक
कोल्हापूर : 'नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल'च्या (NGT) नियमांचे उल्लंघन करून कोल्हापूर शहरात सर्रासपणे वृक्षांची कोंडी आणि वृक्षहत्या केली जात असल्याचा खळबळजनक आरोप 'सुराज्य अभियाना'ने केला आहे. 'जागतिक वसुंधरा दिना'चे औचित्य साधून आयोजित पत्रकार परिषदेत अभियानाचे समन्वयक महेंद्र अहिरे यांनी महापालिका प्रशासन आणि कंत्राटदारांच्या मनमानी कारभारावर कडक ताशेरे ओढले. शहरात वृक्षारोपणाचे केवळ देखावे केले जात असून, प्रत्यक्षात शेकडो झाडांच्या मुळांभोवती सिमेंटचे काँक्रीटीकरण करून त्यांचा गळा आवळला जात असल्याचे पुरावे यावेळी सादर करण्यात आले.
नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलच्या आदेशानुसार, कोणत्याही झाडाच्या बुंध्याभोवती किमान १ मीटर जागा रिकामी ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, कोल्हापुरातील राजारामपुरी, टाऊन हॉल आणि जिल्हा मध्यवर्ती बँक परिसरातील रस्त्यांच्या कामात झाडांच्या खोडाला चिकटून काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. यामुळे झाडांना पाणी आणि हवा मिळत नसल्याने ती मृत होत आहेत. विशेष म्हणजे, महापालिकेने माहिती अधिकारात १७,५३३ झाडांच्या सभोवतालचे सिमेंट काढल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात ही झाडे अद्यापही सिमेंटच्या विळख्यात असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले आहे.
या गंभीर प्रकाराबद्दल कंत्राटदार आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी सुराज्य अभियानाने केली आहे. रस्ते आणि फूटपाथच्या नवीन निविदेमध्ये झाडांभोवती १ मीटर जागा सोडण्याच्या अटीचा समावेश करावा, अन्यथा 'नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल'मध्ये अवमान याचिका दाखल करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या परिषदेला विविध हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.