विश्वविजेता भारत! अहमदाबादमध्ये रचला इतिहास; न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवत टीम इंडिया तिसऱ्यांदा 'चॅम्पियन'
schedule08 Mar 26 person by visibility 278 categoryक्रीडा
अहमदाबाद : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारतीय क्रिकेटने एक सुवर्ण अध्याय लिहिला आहे. टी-२० विश्वचषक २०२६ च्या अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करून तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. या ऐतिहासिक विजयामुळे भारताने २००७ आणि २०२४ च्या यशाची पुनरावृत्ती केली असून, सूर्यकुमार यादवचे नाव आता विश्वविजेत्या कर्णधारांच्या मांदियाळीत मानाने कोरले गेले आहे.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, जो भारतीय फलंदाजांनी पूर्णपणे चुकीचा ठरवला. सलामीवीर अभिषेक शर्मा (५२ धावा) आणि संजू सॅमसन (८९ धावा) यांनी ४३ चेंडूत ९८ धावांची वादळी सलामी दिली. सॅमसनने आपल्या खेळीत ८ उत्तुंग षटकार ठोकले, तर इशान किशननेही ५४ धावांचे योगदान दिले. मधल्या फळीत जिमी नीशमने एकाच षटकात तीन बळी घेतल्याने धावगती किंचित मंदावली होती, परंतु शेवटच्या षटकात शिवम दुबेने (नाबाद २६) फटकेबाजी करत भारताला २० षटकांत २५५ धावांपर्यंत पोहोचवले. हा टी-२० विश्वचषक फायनलमधील सर्वोच्च स्कोअर ठरला आहे.
२५६ धावांच्या विशाल लक्षाचा पाठलाग करताना किवी संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. टिम सेफर्ट (५२ धावा) आणि मिचेल सँटनर (४३ धावा) यांचा अपवाद वगळता न्यूझीलंडचा एकही फलंदाज भारतीय गोलंदाजीसमोर टिकू शकला नाही. डॅरिल मिचेलने १७ धावा केल्या, मात्र इतर सात फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. भारताच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडचा संपूर्ण संघ १९ व्या षटकात १५९ धावांवर गारद झाला.
२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात याच मैदानात झालेल्या पराभवाच्या जखमेवर या विजयाने फुंकर घातली आहे. भारताने केवळ विजयच मिळवला नाही, तर न्यूझीलंडविरुद्धचा टी-२० विश्वचषकातील पराभवाचा जुना रेकॉर्डही मोडीत काढला आहे. या विजयानंतर संपूर्ण देशात दिवाळीसारखा उत्साह साजरा केला जात आहे.