मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शासनाने तातडीने आणि कायदेशीर तोडगा काढावा: खासदार शाहू छत्रपती महाराज
schedule13 Sep 26 person by visibility 49 categoryराज्य
कोल्हापूर : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कोल्हापूर जिल्हातील मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी जाहीर केले आहे. मराठा समाज गेली अनेक वर्षे आरक्षणासह विविध मागण्या आणि सोयी-सुविधांसाठी लोकशाही मार्गाने लढा देत असल्याचे त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
खासदार शाहू छत्रपती महाराजांनी नमूद केले की, या आंदोलनाच्या पुढील टप्प्यात समाजाने प्रचंड मोठ्या प्रमाणावर शांततामय मूक मोर्चे काढले तसेच विविध तालुके आणि जिल्ह्यांमध्ये ठिय्या आंदोलने केली. मनोज जरांगे पाटील यांनी विविध ठिकाणी प्रदीर्घ उपोषणे केली, तेव्हा शासनाने आश्वासने देऊन आंदोलने थांबवली. मात्र, ही आश्वासने पूर्णतः अंमलात आणण्यात शासन आणि शासकीय यंत्रणा अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरलेली नाही, ज्यामुळेच जरांगे पाटील यांना पुन्हा आमरण उपोषण सुरू करावे लागले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या या आंदोलनाला यापूर्वीही सकल मराठा समाजाने पाठिंबा दिला होता आणि आता होणाऱ्या आंदोलनालाही कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे, असे खासदार शाहू छत्रपती महाराजांनी स्पष्ट केले.
⚪️ "शासनाने पुढाकार घेऊन मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत, त्या कायदेशीर कसोटीवर टिकतील अशा पद्धतीने तातडीने आणि प्रभावीपणे पूर्ण कराव्यात, अशी आमची अपेक्षा आहे." : खासदार शाहू छत्रपती महाराज